आम्ही पती-पत्नीसारखं राहिलो, दोघांसाठी घर बांधत होतो..; कंगना राणौतबद्दल जेव्हा अभिनेत्याने केला खुलासा
अभिनेत्री कंगना राणौतचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत होतं. तिच्यासोबतच्या रिलेशनशिपबद्दल एका अभिनेत्याने मुलाखतीत मोठा खुलासा केला होता. आम्ही पती-पत्नीसारखे राहत होतो, असं त्याने म्हटलं होतं.

बॉलिवूड इंडस्ट्रीत अशी अनेक नाती पहायला मिळतात, जी तुटल्यानंतर लोकांसमोर कटू सत्य येतं. असंच एक नातं अभिनेता आदित्य पांचोलीचंही होतं, जे सुरुवातीला लोकांच्या नजरेपासून लपून राहिलं, परंतु जेव्हा त्या नात्यातच काही गोष्टी बिनसल्या, तेव्हा जगापासून ते लपवणं कठीण गेलं. आदित्य पांचोली त्याच्या करिअर आणि चित्रपटांपेक्षा अधिक अभिनेत्री कंगना राणौतसोबतच्या अफेअर आणि ब्रेकअपमुळे चर्चेत राहिला. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा कंगना नुकतीच इंडस्ट्रीत आली होती आणि विवाहित आदित्यवर तिचं प्रेम जडलं होतं. सुरुवातीला हे नातं खूपच प्रेमळ आणि गोडव्याने परिपूर्ण असं होतं. मात्र नात्यातील हा गोडवा फार काळ टिकू शकला नव्हता. जेव्हा कंगना आणि आदित्यमध्ये खटके उडाले, तेव्हा बऱ्याच गोष्टी समोर आल्या आणि ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
कंगनाने आदित्यला तिच्या वडिलांच्या वयाचा असल्याचं म्हटलं होतं. “या व्यक्तीने माझ्या डोक्यावर मारलं होतं आणि त्यामुळे रक्त येत होतं. मीसुद्धा माझी चप्पल काढली आणि त्याच्या डोक्यावर जोरात मारलं”, असा धक्कादायक खुलासा कंगनाने केला होता. तर आदित्यनेही एका मुलाखतीत कंगनाला केलेल्या मदतीचा आणि तिच्यासोबत पती-पत्नीसारखं राहिल्याचा उल्लेख केला होता. कंगनाने आणखी एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या वडिलांच्या वयाच्या आदित्य पांचोलीने तिला घरात बंदी बनवून ठेवलं होतं. अखेर स्वत:ला वाचवण्यासाठी तिने पहिल्या मजल्याच्या खिडकीतून उडी मारली होती. नंतर आदित्यने कंगनावर फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
View this post on Instagram
कंगनाने आदित्यवर शारीरिक शोषणाचा आरोप करत तक्रारही दाखल केली होती. कंगना 21 वर्षांची असताना त्यांच्या पाच वर्षांच्या नात्याचा शेवट झाला होता. आदित्यने एका मुलाखतीत कंगनाची बहीण रंगोलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यानंतर तिची कशी मदत केली याविषयीही सांगितलं होतं. “मी तिच्या बहिणीच्या प्लास्टिक सर्जरीवर 10 लाख रुपये खर्च केले होते. पण मी ते पैसे तिच्याकडून काही परत मागत नाही. मी सर्व बिल भरले. मी सर्वकाही माफ केलंय. आम्ही पती-पत्नीसारखे राहत होतो. मी यारी रोडवर आमच्या दोघांसाठी घर बांधत होतो. ती वापरत असलेला फोनही माझाच होता. तिच्यासाठी मी माझं लग्नही पणाला लावलं होतं. मी तिला माझ्या आयुष्यातील पाच वर्षे दिली होती. तिने स्वत:बद्दल सत्य सांगावं एवढीच माझी इच्छा होती”, असं त्याने स्पष्ट केलं होतं.
