Kapil Sharma : कपिल शर्मा लॉरेन्सच्या निशाण्यावर का ? सलमानशी जवळीक भोवत्ये ?
कॅनडातील सरे येथील कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर दुसऱ्यांदा गोळीबार झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. दुसऱ्या गोळीबाराच्या घटनेने कपिल शर्मा खूप अस्वस्थ झाला आहे.या हल्ल्यामागीच अनेक कारणं समोर येत आहे.

कॅनडातील सरे शहरातील कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये पुन्हा एकदा गोळीबार झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सरे येथील कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये एका महिन्याच्या आत गोळीबार होण्याची ही दुसरी वेळ आहे. मात्र, सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालं नाही. त्यामुळे गँगस्टर टोळीचा हेतू कोणाला मारणं नव्हे तर घाबरवणं हाच हेतू असल्याचं यातून दिसून येतंय.
गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही कॅफेवर गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई अलायन्स म्हणजेच गोल्डी ढिल्लॉन, अंकित बंधू शेरेवाला, जितेंद्र गोगी मान ग्रुप, कला राणा, आरजू बिश्नोई, हरी बॉक्सर, शुभम लोणकर आणि साहिल दुहान पेटवाड यांनी घेतली आहे.
पण अभिनेता आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा लॉरेन्स टोळीच्या निशाण्यावर का आहे? असा प्रश्न असा निर्माण होत आहे. विविध भारतीय सुरक्षा एजन्सींनी याची चौकशी केली आहे आणि कपिल शर्माला लॉरेन्स टोळीने लक्ष्य करण्यामागे अनेक कारणे समोर आली आहेत.
सलमानशी जवळीक भोवते का ?
काळवीट शिकार प्रकरणापासून सलमान खान लॉरेन्स टोळीचे प्रमुख लक्ष्य आहे. लॉरेन्स टोळीने सलमान खानला अनेक वेळा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सलमानचं फार्म हाऊस आणि त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची केवळ रेकीच केली नाही तर गॅलेक्सी अपार्टमेंटवरही गोळीबार करण्यात आला, त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली. गेल्या काही वर्षांत अभिनेता आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार कपिल शर्मा सलमान खानच्या खूप जवळचा झाला आहे. तो सलमानच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक मानला जातो. लॉरेन्स गँग आणि त्याच्या सदस्यांना हीच गोष्ट त्रास देत आहे आणि कपिल शर्माला लक्ष्य करून, लॉरेन्स गँग सलमानच्या इतर जवळच्या सहकाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो.
शीख धर्मावर केलेल्या टिप्पण्यांमुळे नाराज ?
लॉरेन्स टोळी आणि त्याचे साथीदार पंजाबचे आहेत. अलिकडेच कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा’ शोमध्ये एका स्पर्धकाने धर्मावर विनोदी टिप्पणी केली. त्यानंतर कपिल शर्माला धमक्या येऊ लागल्या. यानंतर, लॉरेन्स आणि त्याच्या सहयोगी टोळ्यांनी कपिल शर्माला या टिप्पणीसाठी धमकीच दिली नाही तर कॅनडामधील त्याच्या कॅप्स कॅफेवर गोळीबारही केला.
कपिल शर्माचं वाढतं स्टारडम आणि खंडणीचा खेळ
कपिल शर्माच्या ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल शर्मा’ या शोमध्ये सहभागी झालं नाही, असा कोमताही चित्रट किंवा कलाकार नाही, एखादाच कोणी असेल जो या शोमध्ये आला नाही. यामुळेच कपिलला बॉलिवूडमध्ये एका वेगळ्या पातळीवर नेले, त्यानंतर कपिल शर्माला केवळ प्रसिद्धीच मिळाली नाही तर प्रचंड संपत्तीही मिळाली. कपिलला या गुंडांनी लक्ष्य करण्यामागे हेच मुख्य कारण असू शकते असे सूत्रांचे मत आहे. लॉरेन्स आणि त्याचे सहयोगी कपिलकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत असू शकतात.
या गुंडांनी प्रथम पंजाबमधील गायक आणि अभिनेत्यांना लक्ष्य केले आणि त्यांच्याकडून संरक्षण पैशाच्या स्वरूपात कोट्यवधी रुपये उकळले. आता असं म्हटलं जातंय की बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व कपिल शर्माला घाबरवून लॉरेन्स बिश्नोई अँड कंपनी बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू इच्छित आहे आणि डी कंपनीप्रमाणे मुंबईवर कब्जा करण्याची त्यांची इच्छा आहे.
गोळीबारानंतर घाबरला कपिल शर्मा
मुंबई पोलिसांच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, जेव्हा कपिल शर्माच्या कॅफेमध्ये पहिल्यांदा गोळीबार झाला तेव्हा मुंबई पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा काळात कपिल शर्माने संपूर्ण घटना मुंबई पोलिसांना सांगितली, मात्र तेव्हा तो खूप घाबरला होता. मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्माला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली आहे. गरज पडल्यास त्याच्या सुरक्षेचा आढावा घेऊन त्यात वाढ केली जाऊ शकते.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या शुभम लोणकर याचाच कॅनडामधील कपिल शर्माच्या कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराबद्दल पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की सलमान खाननंतर कपिल शर्मा लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या सहयोगी टोळीच्या निशाण्यावर असू शकतो.
