कंगना यांच्या अडचणीत मोठी वाढ, ‘या’ कारणामुळे विरोध, काही झाल्यास कोण जबाबदार?
Kangana Ranaut: कंगना रणौत कायम असतात वादाच्या भोवऱ्यात, आता देखील मोठ्या कारणामुळे होतोय विरोध, विरोधा दरम्यान काही झाली झाल्यास कोण जबाबदार?

अभिनेत्री कंगाना रणौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. अभिनेत्री अनेकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पण कंगना त्यांच्या वक्तव्यांमुळे नाही तर, सिनेमामुळे चर्चेत आहे. कंगना रणौत स्टारर ‘इमर्जन्सी’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी देखील कंगना यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. सेन्सॉर प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अभिनेत्रीच्या वाट्यात अनेक अडचणी आल्या. अभिनेत्रीला कोर्टाची पायरी चढावी लागली. आता सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देखील कंगना यांच्या अडचणी वाढल्याची माहिती समोर येत आहे.
सिनेमा शुक्रवारी म्हणजे 17 जानेवारी रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देखील वाद कमी झालेले नाही. कंगना यांचा सिनेमा पंजाबमध्ये प्रदर्शित झाल्यास चित्रपटगृहांबाहेर निदर्शने केली जातील, अशी घोषणा शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) केली आहे.
एसजीपीसी कर्मचाऱ्यांना पंजाबमध्ये तैनात करण्यात आले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेली आणि काही घडल्यास जबाबदारी पंजाब सरकारची असेल… असं देखील समितीने सांगितलं आहे. या आंदोलनामुळे अमृतसरमधील चित्रपटगृहांबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.




सिनेमाचे शो रद्द करण्यात आले
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर येथील पीव्हीआर सिनेमा येथे शुक्रवारी ‘इमर्जन्सी’ सिनेमाचा शो रद्द करण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरी येथील सिनेपोलिसच्या बाहेर देखील शांतता होती. फर्स्ट डे फर्स्ट शोला विरोध होत असल्यामुळे सिनेमा किती कमाई करेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने पंजाबमध्ये सिनेमा बॅन करण्याची मागणी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, SGPC अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहिलं होतं. ज्यामध्ये पंजाबमध्ये सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. कंगना यांनी सिनेमात शिखा समाजाची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सांगायचं झालं तर, पहिल्यांदा गुरुद्वारा कमेटीने कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ सिनेमाला विरोध दर्शवला होता. गेल्या वर्षीही शीख संघटनांनी सिनेमाच्या ट्रेलरला विरोध दर्शवला होता. हे पाहता सेन्सॉर बोर्डाने त्याचे प्रमाणपत्र थांबवलं होतं. सिनेमात अनेक बदल सुचवल्यानंतर प्रदर्शनाला ग्रीन सिग्नल देण्यात आला.
‘इमर्जन्सी’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, खुद्द कंगना यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. ‘इमर्जन्सी’ सिनेमात 1975 मध्ये इंदिरा गांधींनी लागू केलेल्या 21 महिन्यांच्या आणीबाणीच्या दिवसांबद्दल सांगण्यात आलं आहे. सिनेमात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी, मिलिंद सोमण आणि विशाक नायर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.