इंडस्ट्रीत बंदी घातल्यानंतर रणवीर सिंह पोहोचला चामुंडेश्वरी मंदिरात; केली पूजा
बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी घालण्याच्या आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेता रणवीर सिंह म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. या मंदिरात त्याने पूजासुद्धा केली. रणवीरने मंदिराला दिलेली ही भेट 'कांतारा' चित्रपटाच्या वादाशी संबंधित आहे.

फरहान अख्तरच्या ‘डॉन 3’ या चित्रपटातून शूटिंगच्या अवघ्या काही दिवस आधी माघार घेतल्याने अभिनेता रणवीर सिंह मोठ्या वादात सापडला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) रणवीरवर थेट बंदी घातली आहे. चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारांना त्याच्यासोबत काम करू नये असे निर्देश देण्यात आला आहे. या मोठ्या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी सकाळी रणवीर म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात प्रार्थनेसाठी पोहोचला. या मंदिरातील त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रणवीरची चामुंडेश्वरी मंदिरातील ही भेट ‘कांतारा’ चित्रपटातील देवीची नक्कल केल्याच्या प्रकरणाशी संबंधित आहे.
नेमका वाद काय?
गोवा सरकारद्वारे आयोजित 56 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात रणवीरने ‘कांतारा : चाप्टर 1’च्या क्लायमॅक्समध्ये दाखवलेल्या चावुंडी देवीचा अपमान केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं होतं आणि कोर्टात रणवीरला बिनशर्त माफी मागावी लागली होती. त्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रणवीरने आता मंदिरालाही भेट दिली आहे. न्यायालयाने चार आठवड्यांच्या आत रणवीरला चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन प्रार्थना करण्याचा आदेश दिला होता. रणवीरने या आदेशाचं पालन करत मंदिराला भेट दिली आणि देवी चामुंडेश्वरीकडे विशेष प्रार्थना केली. त्याच्या या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. मंगळवारी पहाटे मुंबई विमानतळावर दिसलेल्या रणवीरने म्हैसूरमध्ये मंदिराच्या गर्भगृहात पोहोचेपर्यंत तोंडाला मास्क लावला होता.
‘इफ्फी’च्या मंचावरील कृत्यामुळे रणवीरवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती आणि त्याच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. 24 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान रणवीरचे वकील साजन पूवैय्या म्हणाले, “रणवीर माफी मागणारं प्रतिज्ञपत्र दाखल करेल आणि क्षमा मागण्यासाठी मंदिरातही जाईल.” परंतु रणवीरची माफी ही वरवरची होती, ती प्रामाणिक नव्हती, असा आरोप तक्रारदाराच्या वकिलांनी केला. रणवीरने फक्त सोशल मीडियावर माफी मागितली आणि त्याचा तो अकाऊंट मॅनेजर सांभाळतो. त्यामुळे त्याने चावुंडी मंदिरात जाऊन माफी मागायला हवी, असं ते म्हणाले. ‘इफ्फी’च्या मंचावर रणवीरने चावुंडी देवीचा उल्लेख ‘भूत’ म्हणून केला होता.
