‘लागिरं झालं जी 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार? शिवानी बावकर म्हणाली, ‘आम्ही दोघं एकत्र…’
लागिरं झालं जी या मालिकेने अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. अशातच आता पुन्हा एकदा शीतल आणि अजिंक्य एकत्र येणार असल्याची चर्चा आहे.

काही मालिका संपल्यानंतरही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लागिरं झालं जी’ ही त्यापैकीच एक. 2017 मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने ग्रामीण पार्श्वभूमी, सैन्यात भरती होण्याची तरुणांची धडपड, मैत्री, प्रेम आणि संघर्ष अशा विविध पैलूंमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. जवळपास दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर 2019 मध्ये मालिकेने निरोप घेतला.
मालिकेतील शीतल आणि अजिंक्य ही जोडी विशेष लोकप्रिय ठरली. शिवानी बावकरने शीतलची, तर नितीश चव्हाणने अजिंक्यची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर अजिंक्य, राहुल आणि विक्रम यांची मैत्री तसेच भय्यासाहेब हे पात्रही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात राहिले.
मालिका संपल्यानंतर शिवानी आणि नितीश यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, या दोघांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा चाहत्यांकडून सातत्याने व्यक्त केली जाते. नुकतेच एका शूटिंगच्या निमित्ताने शिवानी आणि नितीश अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. यावेळी त्यांनी चाहत्यांसाठी काही मजेशीर रील्सही शूट केल्या.
‘लागिरं झालं जी 2’ येणार आहे का?
या रील्स सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. अनेकांनी कमेंट्समध्ये ‘लागिरं झालं जी 2’ येणार आहे का? असा सवालही केला. यावर शिवानी बावकरने स्वतः उत्तर देत मालिकेच्या दुसऱ्या भागाबाबतचे सत्य स्पष्ट केले.
शिवानीने सांगितले की, ‘लागिरं झालं जी’च्या दुसऱ्या भागासाठी त्या दोघांची भेट झालेली नाही. एका शूटिंगसाठी अनेक वर्षांनंतर त्यांची भेट झाली होती. चाहत्यांकडून आजही दोघांना मोठ्या प्रमाणावर मेसेज येत असल्याने त्यांनी चाहत्यांसाठी काही रील्स बनवण्याचा विचार केला आणि त्या शेअर केल्या.
View this post on Instagram
दरम्यान, नितीश चव्हाण यापूर्वी झी मराठीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. तर शिवानी बावकरने ‘साधी माणसं’ या स्टार प्रवाहवरील मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. त्यामुळे आता शिवानी आणि नितीश पुन्हा कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार का, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. मात्र, सध्यातरी ‘लागिरं झालं जी 2’बाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
