अभिनय सोडून शेती करायला लागला हा अभिनेता, झालं इतकं कर्ज की स्वत:ची गाडी विकावी लागली, रिकवरी एजेंट द्याचे शिव्या
वयाच्या 42 व्या वर्षा अभिनय सोडून घेतला शेती करण्याचा निर्णय. पण झाला प्रचंड कर्जबाजारी. इतकं झालं कर्ज की अभिनेत्याला विकावी लागली गाडी. कोण आहे हा अभिनेता?

‘साराभाई वर्सेस साराभाई’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता राजेश कुमारने आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर असताना अभिनय क्षेत्राला काही काळासाठी रामराम ठोकून शेती करण्याचा घेतलेला निर्णय त्याला मोठ्या आर्थिक संकटात घेऊन गेला. या निर्णयामुळे त्याने जवळपास सर्व काही गमावल्याचे त्याने सांगितले.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश कुमारने सांगितले की, वयाच्या 42 व्या वर्षी त्याने अभिनयातून ब्रेक घेत शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय आर्थिकदृष्ट्या अतिशय तोट्याचा ठरला. मी जवळपास सर्व काही गमावले असे त्याने स्पष्टपणे सांगितले. अभिनयापासून दूर घालवलेली पाच वर्षे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा शिकण्याचा काळ ठरल्याचेही त्याने नमूद केले.
कर्जाच्या ओझ्याखाली जगावे लागले
शेतीत अपेक्षित यश न मिळाल्याने राजेश कुमारवर मोठे कर्ज झाले. त्याने सांगितले की, कर्ज फेडण्यासाठी त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. एवढेच नाही तर क्रेडिट कार्डच्या थकबाकीमुळे रिकव्हरी एजंट त्याचा सतत पाठपुरावा करत होते.
या कठीण काळाची आठवण सांगताना तो म्हणाला, ‘माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे क्रेडिट कार्ड रिकव्हरी एजंट माझ्या इमारतीच्या वॉचमनच्या केबिनमध्ये फोन करून माझ्याविषयी अपमानास्पद भाषा वापरत असत.’
कार विकावी लागली
आर्थिक अडचणी इतक्या वाढल्या की, त्याला स्वतःची कार विकावी लागली. त्यानंतर त्याच्याकडे उरलेले शेवटचे वाहनही त्याने नाशिकमधील शेतकऱ्यांकडे सोपवले. त्याचे पैसे देणे बाकी असल्याने हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले.
या सर्व संकटांनंतरही राजेश कुमारने या काळाकडे नकारात्मक दृष्टीने न पाहता, तो आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा शिकण्याचा अनुभव असल्याचे सांगितले. तो म्हणाला, ‘गेल्या चार-पाच वर्षांत मला आयुष्याची सर्वात मोठी शिकवण मिळाली. हा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा होता.’ या अनुभवामुळे केवळ तो एक चांगला व्यक्तीच बनला नाही तर एक अभिनेता म्हणूनही अधिक सक्षम झाला. विविध परिस्थिती जवळून अनुभवल्यामुळे आता वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा अधिक प्रभावीपणे साकारता येतात असे त्याने सांगितले.
