PM Modi Tour : मोदी-जयशंकर एकाचवेळी 5 मुस्लिम देशांच्या दौऱ्यावर, ही मैत्री इतकी भक्कम बनवण्यामागे भारताची दोन महत्वाची उद्दिष्ट्य
PM Modi-Jaishankar Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन तर परराष्ट्र मंत्री जयशंकर सहा देशांच्या दौऱ्यावर आहेत. दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यात बहुसंख्य मुस्लिम देश आहेत. भारताने आता मुस्लिम देशांसोबत मैत्री भक्कम करण्यावर लक्ष केंद्रीत केलय. त्यामागची रणनिती काय आहे? जाणून घ्या.

भारताने सध्या मुस्लिम देशांवर आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. मुस्लिम देशांसोबत मैत्री भक्कम करण्यावर भारताचा भर आहे. कतरपासून इंडोनेशियापर्यंत भारत आपले कूटनितीक संबंध बळकट बनवत आहे. एकाबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी तर दुसऱ्याबाजूला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. दोघेही सध्या वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर आहेत. पीएम मोदी तीन देशांच्या तर एस जयशंकर सहा देशांच्या दौऱ्यावर आहेत. यात चार मोठे मुस्लिम देश आहेत. मोदी-जयशंकर जोडी सध्या भारताच्या मजबूत परराष्ट्र धोरणाचा चेहरा बनली आहे. पीएम मोदी यांच्याकडे मोठा दृष्टीकोन आणि रणनितीक समज आहे. जयशंकर ती रणनिती प्रत्यक्षात आणतात. जयशंकर कतर, बहरीन, कुवैत आणि ओमान सारख्या आखाती देशांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनेशियामध्ये आहेत. इंडोनेशिया जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश आहे. भारताने आखाती आणि मुस्लिम बहुल देशांसोबत आपले संबंध अधिक दृढ बनवले आहेत.
पश्चिम आशियात वाढत्या तणाव काळात भारताने महत्वाची रणनितीक भूमिका बजावली. मिडिल ईस्टमध्ये शांतता टिकून रहावी यासाठी भारताने जवळपास प्रत्येक आखाती आणि मुस्लिम देशाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत चर्चा केली. भारत आता सुपरपावरच्या दबावाखाली येणारा देश राहिलेला नाही. आखातापासून ते आसियानपर्यंत प्रत्येक आघाडीवर भारत बिनधास्तपणे आपली भूमिका मांडतो. संकटाला संधी मध्ये बदलण्याची आजच्या भारताची क्षमता आहे. भारत एकाचवेळी इतक्या मुस्लिम देशांसोबत संबंध भक्कम करतोय, त्यामागे मुख्य कारण म्हणजे बिझनेस, डिफेन्स निर्यात वाढवणं आणि दुसरं गरजेच्यावेळी त्यांनी भारताच्या बाजूने उभं राहणं, जेणेकरुन पाकिस्तान एकाकी पडेल.
‘एक्ट ईस्ट पॉलिसी’ अजून मजबूत होईल
भारत आणि इंडोनेशियाने 2018 साली आपल्या संबंधांना कॉम्प्रिहेंसिव स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा दिला. त्यानतंर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इंडोनेशियाचा हा पहिला द्विपक्षीय दौरा आहे. या दौऱ्यामुळे भारताची ‘एक्ट ईस्ट पॉलिसी’ अजून मजबूत होईल. दोन्ही देशांच्या रणनितीक भागीदारीला एक नवीन दिशा मिळेल. इंडोनेशिया आसियानमधला एक मोठा मुस्लिम देश आहे. दोन्ही देश मिळून समुद्री सुरक्षा, संयुक्त सैन्य सराव आणि डिफेन्स इंडस्ट्री पुढे नेण्यासाठी सतत काम करत आहेत. दोन्ही देशांचा फोकस इंडो-पॅसिफिकमध्ये चीन विरुद्ध सुरक्षा रणनिती मजबूत बनवणं आहे. त्यासाठी दोन्ही देश मिळून काम करतायत.
जयशंकर चार मुस्लिम देशांच्या दौऱ्यावर
पश्चिम आशियातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत असताना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचा आखाती देशाचा दौरा होत आहे. जयशंकर यांनी रविवारी कतरचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल-थानी यांची भेट घेतली. या दरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक, संपर्क आणि सुरक्षेसह अन्य सहकार्यांवर चर्चा झाली. कतरमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाची काळजी घेतल्याबद्दल जयशंकर यांनी कतरच्या पंतप्रधानांचे आभार मानले. कतरनंतर जयशंकर बहरीन, कुवैत आणि ओमानचा दौरा करतील.
