GK : अण्वस्त्रांच्या शर्यतीत नंबर एकचा देश कोणता? भारत, पाकिस्तान नेमके कुठे?
सध्या मध्य पूर्वेतील युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. या जगात अनेक देश अण्वस्त्र सज्ज आहेत. यात भारत आणि पाकिस्तान नेमका कुठे आहे, हे जाणून घेऊ या...

Nuclear Weapons In World : सध्या मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धाचा सर्वांनीच धसका घेतला आहे. या युद्धामुळे भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानाच्या जोरावर अनेक देशांनी युद्धसज्जतेच्या बाबतीत मोठी प्रगती केली आहे. यातील काही देशांकडे तर अण्वस्त्र आहेत. दरम्यान, इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगात सर्वाधिक अण्वस्त्रं कोणाकडे आहेत, भारत या स्पर्धेत नेमका कुठे आहे, असे विचारले जात आहे. याच सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…
रशिया आणि अमेरिका यांच्याकडे किती अण्वस्त्रं आहेत?
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. उपलब्ध डेटा आणि अंदाजाच्या मदतीने या इन्स्टिट्यूटने रशियाकडे सर्वाधिक अण्वस्त्र असल्याचे सांगितले आहे. रशियाकडे साधारण 5580 अण्वस्त्रं असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर अमेरिकाचा क्रमांक लागतो. अमेरिकेकडे 5100 ते 5200 अण्वस्त्रं असल्याचा दावा केला जातो. या दोन्ही देशांकडे संपूर्ण जगाला नष्ट करण्याची ताकद असलेली अण्वस्त्रं आहेत.
भारताजवळ किती अण्वस्त्रं आहेत?
अण्वस्त्रांच्या स्पर्धेत चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे. या देशाकडे 600 अण्वस्त्रं आहेत. सोबतच या स्पर्धेत चीन खूप प्रगती करत आहे. चीनकडून संरक्षण क्षेत्रासाठी दरवर्षी वाढीव आर्थिक तरतूद करत आहे. त्यामुळे शस्त्रांच्या बाबतीत चीनचे असलेले धोरण पाहता, जगभरातून चिंता व्यक्त केली जाते. युरोपीय देशांमध्ये फ्रान्सकडे 290 अण्वस्त्रं आहेत. ब्रिटनकडे 225 अण्वस्त्रं आहेत. भारताजवळ सध्या 180 अण्वस्त्रं आहेत. जगात इतर देशांच्या तुलनेत भारत सहाव्या ठिकाणी आहे. भारतही शस्त्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करत आहे. अण्वस्त्रांच्या बाबतीत भारताने गेल्या पाच वर्षांत 5 टक्क्यांनी प्रगती केली आहे.
पाकिस्तानकडे किती अण्वस्त्रं आहेत?
पाकिस्तानच्या तुलनेत भारत अण्वस्त्रं सज्जतेत थोडा पुढे आहे. पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्रं आहेत, असे म्हटले जाते. इस्रायलकडे 90 अण्वस्त्रं आहेत. उत्तर कोरियाकडे 50 अण्वस्त्रं आहेत. अण्वस्त्रांची संख्या वाढावी यासाठी भारत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहे. भारतावर कोणी हल्ला केलाच तर त्याला चोख प्रत्युत्तर देता यावे यासाठी भारत शस्त्रसज्ज होण्यासाठी प्रयत्नशील आहे.
