कोकाटेंचा ‘डाव’ आटोपणार? अजितदादांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला स्पष्टच सांगितलं; मंत्रालयात घडामोडींना वेग
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर आणि व्हायरल झालेल्या रम्मी गेम व्हिडीओनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना तीव्र धारेने खोचले. पवारांनी कोकाटे यांच्या वक्तव्याने सरकारची प्रतिमा मलीन झाल्याचे स्पष्ट केले.

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. माणिकराव कोकाटे यांचा भर सभागृहात अधिवेशनादरम्यान मोबाईलवर रम्मी गेम खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर स्पष्टीकरण देताना कोकाटे यांनी सरकार भिकारी आहे, असे म्हटले होते. या विधानानंतर विरोधकांकडून सातत्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली जात होती. आता याबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे.
माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीला
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुंबईतील मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी-चेंबरमध्ये माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची भेट होत आहे. यावेळी अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्रालयातील अजित पवारांच्या अँटी-चेंबरमध्ये झालेल्या बैठकीत ही नाराजी उघड करण्यात आली. कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. असे अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवलं. या भेटीनंतर कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दलच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाकडून भूमिका स्पष्ट
या बैठकीपूर्वी, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊ नये, अशी मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने अजित पवारांची भेट घेतली होती. “कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे उत्तम कृषिमंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेऊ नका,” अशी भूमिका या शिष्टमंडळाने मांडली होती. मात्र, यावर अजित पवारांनी हा विषय आता माझ्या हातात नाही असं उत्तर दिलं होतं. यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद धोक्यात असल्याचे बोललं जात होते. यानंतर अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यात बैठक सुरु झाली. यावेळी अजित पवारांनी कोकाटेंना चांगलेच झापले.
अजित पवार काय म्हणाले?
“कोकाटे, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे. बोलताना आपण भान ठेवायला हवं,” अशा शब्दांत अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले. “तुमच्या वक्तव्यामुळे सरकारची खूप प्रतिमा मलिन झाली आहे. आम्ही तुम्हाला खूप सांभाळलं आहे. पण हा विषय आता पुढे गेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनीही या संदर्भात माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे,” असे सांगत अजित पवारांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. त्यावर माणिकराव कोकाटे यांनी माझ्याकडून वक्तव्य करण्यासंदर्भात चूक झाली हे मान्य आहे, पण यापुढे असं होणार नाही, असे स्पष्टीकरण दिले.
या बैठकीदरम्यान, छगन भुजबळ हे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात उपस्थित होते. ज्यामुळे राजकीय वर्तुळात या घडामोडींबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. एकंदरीत, माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढल्या असून, त्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
