शिंदे स्वत:चं काही ठरवू शकत नाही, अर्थ खात्याचं काय ठरवणार? अंबादास दानवेंचा टोला
जयंत पाटील यांना राज्यात अर्थमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे, यावर प्रतिक्रिया देताना अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोला लगावला आहे. शिंदे स्वत:चं स्वत: काही ठरवू शकत नाहीत, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

राजकीय वर्तुळात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गट हा एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे देखील उपस्थित होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी गुरुवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीवर शिवेसना ठाकरे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान राज्यात सुरू असलेल्या या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले दानवे?
शरद पवार यांचा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्यासारख्या प्रतिगामी शक्तींसोबत लढत राहिला आहे आणि सत्तेच्या एखाद्या तुकड्यासाठी ते तिथे जातील असं मला आता तरी वाटत नाही, पण कोणाच्या मनात काय आहे हे आत्ताच्या घडीला सांगता येत नाही. हेही राजकीय दृष्ट्या तितकच खरं असल्याचं यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यानन जयंत पाटील यांना अर्थखात मिळण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सध्या सुरू आहे. यावर देखील दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्थ खातं कोणाला द्यायचं हे एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात अजिबात नाहीये, हे सर्व दिल्लीच्या हातात आहे, शिंदे स्वतःचच स्वतः काही ठरवू शकत नाही, तर मग फायनान्स खात्याचं काय ठरवतील? त्यामुळे हे सर्व दिल्लीतच ठरेल, असंही यावेळी दानवे यांनी म्हटलं आहे. दरम्यान दिल्लीमध्ये राजकीय हालचाली वाढल्या आहेत, या प्रश्नाला उत्तर देताना शक्यतेला उत्तर देण्यात काही अर्थ नाही, या गोष्टी झाल्यावरच त्यावर बोलता येईल, असं दानवे यांनी म्हटलं.
