अमरावती-वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या कौडण्यपूर पुलावरील रस्ता उखडला; सलग 30 तास रस्त्यावर पाणी; कित्येक तास वाहतूक बंद
अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक भागात पूरमय स्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणाचे रस्ते पाण्याखालीही गेले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतीपिकांसह अनेक घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांना फटका बसला आहे.
अमरावती: अमरावती जिल्ह्यात सध्या मुसळधार (Amravati Heavy Rain) पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचे (Appar Vardha Dam) सर्वच्या सर्व 13 ही दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे तिवसा तालुक्यातील कौडण्यापूर येथील पुलावरून पाणी वाहत होते. पुलावरून गेल्या 30 तासांपेक्षा अधिक काळ पाणी वाहत असल्याने आर्वी-कौडण्यापुरची (Arvi-Kaudnyapur Bridge) वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दुपारी कौडण्यपूर येथील पुलावरून पाणी ओसरल्यानंतर मात्र या पुलावरील डांबरी रस्ताचा काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे सध्या पुलावरुन वाहतूक करणेही धोकादायक बनले आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक पुलावरून पाणी आले आहे, त्यामुळे पुलावरून वाहतूक करू नका असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
धरणातील पाणी सोडल्यामुळे आणि गेल्या 30 तासापेक्षा जास्त काळ पुलावर पाणी राहिल्याने पुलावरील डांबरीकरणासह पुलाचे कठडेही वाहून गेले आहेत.
रस्ता वाहून गेल्याने धोका
पुलावरील रस्ता वाहून गेल्याने वाहतूकीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे ३६तासा नंतरही आर्वी व कौडण्यापूर मार्ग बंदच ठेवण्यात आला आहे. तसेच मोर्शी येथील अप्पर वर्धा धरननजिक पुलावरून पाणी असल्याने मोर्शी व आष्टी मार्गही 36 तासांपासून बंद करण्यात आला आहे.
आर्वीचा बाजार चुकला
या परिसरातील लोकांची महत्वाची बाजारपेठ ही आर्वी असल्याने आर्वीला नेहमीच नागरिकांना जावे लागते, सध्या या अमरावती-आर्वी पुलावर पाणी आल्याने वाहतूकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आल्याने बाजारपेठला जाणेही मुश्किल बनले आहे.
शेतीपिकांसह नागरिकांना फटका
अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक भागात पूरमय स्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणाचे रस्ते पाण्याखालीही गेले आहेत. जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतीपिकांसह अनेक घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नागरिकांना फटका बसला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून पूरमय भागात नागरिकांनी जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
कौ़डण्यपूरः रुक्मिणीचे माहेरघर
लोकांची बाजारपेठ आर्वी गावी असल्यमामुळे या शहरात परिसरातील नागरिकांची नेहमीच ये जा असते, आता पाणी आल्यामुळे नागरिकांना बाजाराला मुकावे लागले आहे. त्यातच कौ़डण्यपूर हे रुक्मिणीचे माहेरघर असल्याने या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात भाविकांची ये जा असते, मात्र पावसामुळे आता मार्ग बंद असल्याने भाविकही दर्शनाला मुकले आहेत.