राऊत फोडून काढा म्हणताच गिरीश महाजन संतापले, बाळासाहेबांचं नाव घेत सगळंच बाहेर काढलं; जशास तसं उत्तर!
संजय राऊत बोलले की फोडून काढू. पण मग फोडून काढायला सोबत माणसं तर पाहिजेत ना. आता पहिले दिवस गेले. अगोदर बाळासाहेबांच्या शब्दावर अनेक लोक धावून यायचे. आता लोक तर सोबत पाहिजेत ना. लोक त्यांना सोडून निघून जात आहेत. खासदार, आमदार निघून जात आहेत, असा हल्लाबोल गिरीश महाजन यांनी केला.

Sanjay Raut Vs Girish Mahajan : एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची राज्यात चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे ठाकरे यांच्या गटातील खासदार संजय राऊत आणि भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ठाकरे यांच्या पक्षाचे एकूण सहा खासदार फुटल्यामुळे संजय राऊत चांगलेच संतापलेले आहेत. फुटलेले खासदार आपल्या मतदारसंघात दिसताच फोडून काढा, असा एका प्रकारचा आदेशच राऊत यांनी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना दिला आहे. राऊतांच्या याच फोडून काढा या विधानानंतर गिरीश महाजनांसोबत त्यांची जुंपली आहे. आता पुन्हा राऊतांनी केलेल्या दाव्यावर गिरीश महाजन यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
राऊत नेमकं काय म्हणाले?
संजय राऊत यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बंडखोर दिसताच फोडून काढा असे आवाहन केल्यानंतर फोडून काढायला तुमच्याकडे कार्यकर्ते तरी पाहिजेत नाही, असा खोचक टोला गिरीश महाजन यांनी राऊतांना लगावला होता. त्यानंतर राऊत यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन महाजन यांना चांगलेच सुनावले. हिम्मत असेल तर सुरक्षा व्यवस्था सोडून मैदानात या, असं खुलं आव्हान राऊत यांनी दिलं. तसेच ईडी, सीबीआय आमच्याकडे द्या. पुढच्याच 15 मिनिटांत गिरीश महाजन फुटतील, असा दावाही राऊत यांनी केला होता. राऊतांच्या आता याच टीकाला महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं.
आम्हाला ताब्यात घ्यायला त्यांचे केंद्रात सरकार गरजेचे
मला कोणताही बंदोबस्त नाही. मला कोणतीच z, y सुरक्षा नाहीये. माझ्यासोबत एकच पोलीस कॉन्स्टेबल असतो. गेल्या 35 वर्षांपासून मी सुरक्षा देऊ नका असे पत्र लिहून देतो. राज्यातला मी एकमेव मंत्री आहे जो सुरक्षा नाकारतो. मला सुरक्षेची आवश्यकताही भासत नाही, असं गिरीश महाजन म्हणाले. तसेच राऊतांच्या फोडून काढा, या विधानावरही त्यांनी भाष्य केले. आम्हाला ताब्यात घ्यायला त्यांचे केंद्रात सरकार येणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान होणं गरजेचं आहे. त्यामुळे अगोदर उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करा आणि नंतर आम्हाला तब्यात घ्या. नंतर आम्हाला फोडा, असा टोलाही गिरीश महाजन यांनी लगावला.
आता पहिले दिवस गेले
संजय राऊत बोलले की फोडून काढू. पण मग फोडून काढायला सोबत माणसं तर पाहिजेत ना. आता पहिले दिवस गेले. अगोदर बाळासाहेबांच्या शब्दावर अनेक लोक धावून यायचे. आता लोक तर सोबत पाहिजेत ना. लोक त्यांना सोडून निघून जात आहेत. खासदार, आमदार निघून जात आहेत. आता लवकरच नगरसेवकही निघून जातील, असा पलटवार महाजन यांनी केला. तसेच राऊतांच्या बोलण्यात फार काही तथ्य नाही. त्यांना बोलू द्या. ते किती घाणेरडे बोलतायत ते सांगूही शकत नाही. ते थोडे वैतागले आहेत, असाही हल्लाबोल त्यांनी केला.
