कर्नाटकला तो अधिकारच नाही, फडणवीसांनी सांगितला अजितदादा अपघातातील झिरो FIR चा कायदा!
अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यू प्रकरणी कर्नाटक राज्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर आता फडणवीस यांनी कायद्यातील तरतूद समजावून सांगितली आहे. कर्नाटकला एफआयआर दाखल करण्याचा अधिकार नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी कर्नाटक राज्यात झिरो एफआयआर दाखल झाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात FIR दाखल होऊन अजितदादांना न्याय मिळू शकला नाही, अशी खंतही रोहित पावर यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर माहिती दिली. झिरो एफआयआर म्हणजे काय? हे सांगताना कर्नाटक सरकारला अशा प्रकारचा एफआयआर दाखल करून घेण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले. अजितदादांच्या अपघातामागे घातपात असेल तर कोणालाही सोडणार नाही, असे आश्वासनही यावेळी फडणवीस यांनी दिले.
झिरो एफआयआर नेमका काय?
अजितदादांच्या जवळचे लोक सांगू शकतील की अजितदादांची गेल्या पाच-सात वर्षात माझ्याशी जेवढी मैत्री होती, कदाचितच ती इतरांशी असेल. त्यामुळे एफआयआर दाखल होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न का करावे? अजितदादांचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे अगोदर एडीआर होतो. एडीआर नंतर एफआयआरमध्ये रुपांतरीत होतो. या अपघाताप्रकरणी कर्नाटकमध्ये झीरो एफआयआर दाखल झाला. परंतु हा झिरो एफआयआर हा बेकायदेशीर आहे. कर्नाटकला हा झिरो एफआयआर घेण्याचा अधिकार नाही. ज्यावेळी पीडित एफआयआर करण्याच्या स्थितीत नसेल, तेव्हाच पीडित व्यक्तीला झिरो एफआयआर करता येतो. झिरो एफआयआर दाखल करणे हे कर्नाटक सरकारच्या अधिकारातच नाही, असा कायदा फडणवीस यांनी सांगितला.
कोणाच्याही बापाला सोडणार नाही
तसेच, एफआयआर दाखल झालाच पाहिजे, असे तुम्हाला वाटत असेल तर भारतीय न्याय संहितेतील तरतुदीनुसार तुम्हाला न्यायालयात दाद मागता येते. त्यानंतर न्यायालय एफआयआर दाखल करा असे निर्देश देते. राजकीय दृष्टीकोन ठेवून कर्नाटक राज्याने हे कृत्य केले आहे. महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हे केले आहे, असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला. आम्ही आकाश पातळ एक करू. अजितदादांचा घातपात असेल तर या प्रकरणात कोणाच्याही बापाला सोडणार नाही, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
