मॉर्निंग वॉक करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रकची जोरदार धडक, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावात झालेल्या भीषण रस्ते अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मॉर्निंग वॉक दरम्यान भरधाव ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. जखमींच्या उपचारासाठी सरकारने मदत केली आहे. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला आहे.

गडचिरोलीकरांसाठी आजची सकाळी अत्यंत वेदनादायी ठरली. गडचिरोलीत काटली गावात पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांवर भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेत चार विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काटली गावातील काही तरुण पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉक करत होते. त्याचवेळी एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान आणखी दोन विद्यार्थ्यांनी प्राण गमावले. उर्वरित दोन विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.
मृत्यू झालेल्या चार युवकांचे नाव
१) तनवीर बालाजी मानकर – १६ वर्ष
२) टिकू नामदेवराव भोयर – १५ वर्ष
३) भूषण दुर्योधना मेश्राम – १४ वर्ष
४) तुषार राजू मारबाते – १४ वर्ष
या अपघातानंतर गावात शोककळा पसरली आहे. सध्या गडचिरोलीतील गावकऱ्यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अपघाताच्या निषेधार्थ संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. सुसाट वेगाने वाहन चालवणाऱ्या आणि दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
राज्याचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, गंभीर जखमी झालेल्या दोन विद्यार्थ्यांना पुढील उपचारांसाठी नागपूरला हेलिकॉप्टरने हलवण्याची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 7, 2025
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी-गडचिरोली महामार्गावर एका अपघातात 4 युवकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 2 युवक जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना नागपूर येथे पाठवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली असून पुढच्या 1 तासात त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येईल. मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, तर जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
