प्रचंड वादळ, चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती, पानटपरी हवेत उडाली… सिंधुदुर्गमधील व्हिडिओ व्हायरल
सिंधुदुर्गमध्ये बुधवारी संध्याकाळी काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. ओरोस, सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ले भागात या वादळी पावसाने थैमान घातले. ओरोस येथे तर चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
राज्यात अनेक भागात तापमानाने ४० पार केली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तापमान ४३ अंश सेल्सियसपेक्षा जास्त झाले आहे. त्याचवेळी राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. कोकणात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. सिंधुदुर्गमधील वादळी वाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडल्याचे दिसत आहे. वादळामुळे धुळींचे प्रचंड लोट पसरले असून समोरचे काही दिसत नाही. त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.
सिंधुदुर्गमध्ये बुधवारी संध्याकाळी काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळला. ओरोस, सावंतवाडी, कुडाळ व वेंगुर्ले भागात या वादळी पावसाने थैमान घातले. ओरोस येथे तर चक्रीवादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या वादळाचा एक व्हिडिओ वायरल झाला असून यात जोरदार पावसासह वादळ दिसून येत आहे. या वादळात एक पान टपरी पाला पाचोळयाप्रमाणे उडून गेली. तर काही भागात विजेचे खांब उन्मळून पडले तर रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती.
चिपळूण तालुक्यात नुकसान
अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील डेरवण भागात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त झालेल्या डेरवण गावातील सुर्वेवाडी, काजारकोंड, गणेशवाडी या भागात स्थानिक आमदार शेखर निकमांनी पाहाणी करुन तात्काळ पंचनामे आणि मदत मिळावी यासाठी यंत्रणेला सूचना केल्या.
प्रचंड वादळ, समोरचे काही दिसेना, झाडेही पडली, सिंधुदुर्गमधील व्हिडिओ#Sindhudurg #Rain pic.twitter.com/ctI7mEFxuD
— jitendra (@jitendrazavar) May 23, 2024
यवतमाळमध्ये जोरदार पाऊस
गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळत आहेत. बुधावारी रात्री दरम्यान वादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात दारव्हा आणि महागांव तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना जबरदस्त फटका बसला असून संपूर्ण केळीची बाग उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त केळी उत्पादकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहेत.
अमरावती जिल्ह्यात पाऊस
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला भागात अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने केळीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. कारला व आजूबाजूच्या परिसरात वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडली, तर शेतात परिपक्व झालेल्या केळीची झाडे मोडून पडल्याने जमीनदोस्त झाली. काही दिवसांवर तोडणीस आलेले पीक निसर्गाने हिरावून नेले. २५ हेक्टरमधील केळी पिकाचे नुकसान झाले. शासनाने तातडीने केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणीसुद्धा शेतकऱ्यांनी केली आहे.