सगळंच डोळ्यासमोर… रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या निधनानंतर निलेशची पहिली पोस्ट
Instagram Influencer Death: रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या निधनानंतर पती निलेशने सोशल मीडियावक एक पोस्ट शेअर केली आहे. हा पोस्टमध्ये तो भावूक झाला आहे.

मंगळवेढा येथील रिलस्टार रोहिणी पाराध्ये यांनी टोकाचे पाऊल उचलत स्वत:ला संपवले. वयाच्या 25 व्या वर्षी रोहिणीनी तिच्याच हॉटेलमधील रुममध्ये आपलं जीवन संपवलं. रोहिणीने जवळपास पाच वर्षे पती निलेशसोबत संसार केला. आता निलेशने रोहिणीच्या आठवणीत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मिस यू ग माझ्या चिमणे… असे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर निलेशची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.
काय आहे निलेशची पोस्ट?
निलेशने रोहिणीसोबतचे काही फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने, माझी बायको माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग..या पाच वर्षांच्या सोबतीत तिने मला फक्त साथच दिली नाही, तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं. माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझ्यासाठी तिने किती हाल सोसले, किती कष्ट केले, याची गणतीच नाही. जेव्हा मी खचून जायचो, तेव्हा ती मला आधार द्यायची. जेव्हा सगळे दूर व्हायचे, तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची. माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिने मला बाहेर काढलं असे म्हटले आहे.
मिस यू ग माझ्या चिमणे…
पुढे तो बायकोच्या आठवणीत म्हणाला की, आज चांगले दिवस यायला लागले होते… आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता… पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस. आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम… सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं. चिमणे… परत ये गं… तुला खूप काही सांगायचं बाकी आहे… तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय. तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील. मिस यू ग माझ्या चिमणे…
रोहिणी आणि निलेशचा प्रेमविवाह
रोहिणी आणि निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता. आंतरजातीय विवाह करून हे दोघेही पुणे येथे काही काळ वास्तव्य करत होते. पुणे इथे असतानाच हे दोघेही रील करू लागले. यानंतर आपल्या मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावानं हॉटेल व्यवसाय सुरू केला. रोहिणी आणि निलेश यांचं हॉटेल चांगलं चालत होतं, मात्र त्याच्या शाखा वाढल्या आणि यातून निर्माण झालेला तणाव आणि त्यातमुळे झालेल्या वादामुळे रोहिणीने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं असावं असा अंदाज व्यक्त होत आहे.
