शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठं पॅकेज! प्रत्येक कोंबडीमागे 100 रुपये, तर विहिरींसाठी किती? कोणत्या नुकसानीसाठी किती पैसे मिळणार?
राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. ज्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला आहे त्यासाठी 30 हजार, तसेच वाहून गेलेल्या प्रत्येक जनावरासाठी 37 हजार रुपये दिले जाणार आहेत.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने सर्वात मोठी घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची पत्रकार परिषद घेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार आहे. ज्या विहिरींमध्ये गाळ जमा झाला आहे त्यासाठी 30 हजार, तसेच वाहून गेलेल्या प्रत्येक जनावरासाठी 37 हजार रुपये दिले जाणार आहे. कोणत्या नुकसानीसाठी किती रुपये दिले जातील ते सविस्तर जाणून घेऊयात.
कोणत्या नुकसानीसाठी किती पैसे मिळणार?
- कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500 रुपये दिले जाणार
- हंगामी बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27000 रुपये दिले जाणार
- बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 32500 रुपये दिले जाणार
- गाळ साचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी 30 हजार रुपये दिले जाणार
- पावसामुळे घर पडले असेल तर पीएम आवास योजनेंतर्गत नवीन घर दिले जाणार
- डोंगरी भागातील घरांना 10 हजारांची अधिकची मदत दिली जाणार
- ज्यांच्या घराचं अंशत: नुकसान झालं आहे, त्यांना घर उभारणीसाठी मदत दिली जाणार
- गोठा, दुकानदार यांना 50 हजारांची मदत दिली जाणार
- वाहून गेलेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या जनावरांसाठी प्रति जनावर 37 हजार रुपये दिले जाणार
- खरडून गेलेल्या जमीनीसाठी हेक्टीरी 3 लाख 50 हजारांची मदत, 47 हजार रुपये रोख मिळणार आहेत, बाकी रक्कम मनरेगाच्या माध्यमातून दिली जाणार
- कुकुटपालनाचे नुकसान झाले असल्यास 100 रुपये प्रति कोंबडी मदत दिली जाणार
- विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ केले जाणार
दिवाळीपूर्वी मदत दिली जाणार
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही मदत दिली जाणार आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘ही दिवाळी काळी होऊ देणार नाही अशी आमची भूमिका आहे, त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पंजाब, तामिळनाडू कर्नाटकपेक्षा जास्त निधी आपण दिला आहे. पीक विम्याचीही मदत दिली जाणार आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. सर्व निकष आणि अटी-शर्थी बाजूला ठेवून मदत केली जाणार आहे.’
