Sanjay Raut : दारु विक्रेत्यांना अटक केली, विधीमंडळातील त्यांच्या पोशिंद्यांना हात लावा ना – राऊतांचे आव्हान
पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे विषारी दारूमुळे १५ जणांचा बळी गेला आहे, अनेकजण गंभीर अवस्थेत आहेत. या प्रकरणाच्या तपासात आता CID ची एंट्री झाली असून मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, संजय राऊत यांनी अवैध दारू धंदे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे प्रकरण तापलं आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड येथे विषारी दारू प्यायल्यामुळे 15 जणांचा मृत्यू झाला असून आणखी काहींची प्रकृती गंभीर असल्याने हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणामुळे अख्खं राज्य हादरलं असून याप्रकरणी कोणालाही सोडू नका, हयगय नको, कडक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. या प्रकरणाच्या तपासात आता सीआयडीची एंट्री झाली आहे. मात्र विषारी दारूकांडेच बळी या घटनेवरून वरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी तर जोरदार हल्ला चढवला आहे.
पुणे, पिंपरी या भागात विषारी दारूमुळे सादारण 16 लोकांचा मृत्यू झाला. पुण्यासारख्या, पिंपरी सारख्या शहरात गेल्या काही काळापासून अवैध धंदे, गुन्हेगारी यांचा उद्रेक सुरू आहे. गुन्हेगारी वाढू नये म्हणून पुण्याच्या पोलिसा आयुक्तांनी रात्री 10 नंतर पुणे बंदचा आदेश काढला. कालचं दारूकांड पाहिल्यावर मला असं वाटतं की आयुक्तांना आता दिवसासुद्धा पुणे बंद करावं लागेल, असा टोला राऊत यांनी हाणला. कारण हे गुन्हे रात्री घडलेले नाहीत, ते दिवसाढवळ्या घडलेले गुन्हे आहेत. जर पुण्यामध्ये हातभट्टीची विषारी दारू मिळत्ये आणि लोकं ती दारू पीत आहेत, याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नेटवर्क आहे, असं राऊत म्हणाले.
दारु विक्रेत्यांना अटक केली, विधीमंडळातील त्यांच्या पोशिंद्यांना हात लावा ना
मुख्यमंत्री आता म्हणतात आमचे की संपूर्ण राज्यातलं दारूच नेटवर्क आम्ही उद्ध्वस्त करू. म्हणजे गेली 7 वर्ष तुमच्या आशीर्वादाखाली हे सुरू आहे. मी सरकारमधल्या अनेक आमदारांची नावं देऊ शकतो,ज्यांचे दारू, मटक्याचे व्यवसाय आहेत. हे मुख्यमंत्र्यांनाही माहीत आहे. तुम्ही दारु विक्रेत्यांना अटक केलीत,पण त्यांचे जे पोशिंदे आहेत, जे विधीमंडळात बसले आहेत, त्यांना हात लावा ना, असं आव्हान राऊत यांनी दिलं.
मुख्यमंत्री काल म्हणाले कोणालाही सोडू नका. अशी दुर्घटना घडली की त्यांचं एक बोधवाक्य आहे, ते म्हणजे – कोणालाही सोडू नका. खरं म्हणजे त्यांनी आपल्या खुर्चीच्या मागे, सत्यमेव जयतेच्या खाली लिहायला पाहिजे, कोणालाही सोडू नका. जसं भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे.. तसं हे सरकार अशा गुंडांच्या आणि अवैध धंदे करणाऱ्यांचा पाठिशी आहे,आणि ते त्यांना म्हणतात की भिऊ नका आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असा तिरकस टोला राऊत यांनी लगावला.
टीका केली की सरकारला मिरच्या झोंबतात
मग काही झालं की सरकारचं दुसरं बोधवाक्य असतं, कोणलाही सोडू नका. फक्त पैसे खाणाऱ्यांना, भ्रष्टाचाऱ्यांना सोडा. मी काल मागणी केली होती , की जे 16 लोकं मेले ते हिंदूच आहेत बहुतेक. त्यांना 25 लाख रुपये द्या. आणि जे आरोपी आहेत, त्यांना सध्या अटक करून , रामरहीमप्रमाणे पॅरोलवरती सोडा, वॉशिंगमशीनमध्ये घाला आणि भारतीय जनता पक्षात सामील करुन घ्या, असा टोला हाणत, महाराष्ट्रात हेच चाललंय सगळं, अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली.
आम्ही टीका केली की त्यांना (सरकार) मिरच्या झोंबतात, आम्ही टीका करायची नाही, या विषयावर बोलायचं नाही , मग त्यांचे लोकं समर्थन करायला येतात. या राज्यात दारूबंदी नाही हे मला माहीत आहे, पण जिथे दारूबंदी आहे , वर्धा जिल्हा, तिथे नदीच्या पात्रावर दारूच्या भट्ट्या आहेत हो. कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत या राज्याची अवस्था अत्यंत गंभीर आहे, असंही राऊत म्हणाले.
