Maharashtra News LIVE : तीर्थक्षेत्र तुळजापुरात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाची हजेरी
गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या असह्य उकाड्यापासून तुळजापूर येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे देशातील विदा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यात मुंबईने आघाडी घेतली आहे. यासह देश, क्रीडा, मनोरंजन तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.

LIVE NEWS & UPDATES
-
आमदार विजयसिंह पंडितांनी अवैध वाळूचे तक्रार करताच कारवाई
बीडच्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणारी 7 हायवा वाहने जप्त करण्यात आली आहेत. आमदार विजयसिंह पंडित यांच्या तक्रारीनंतर रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली. या धडक कारवाई दरम्यान वाळू उपसा आणि वाहतूक करणारा सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण गोदापट्ट्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.
-
परभणी जिह्यातील मानवत परिसरातील एका शेतात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ
परभणी जिह्यातील मानवत परिसरातील एका शेतात मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला मानवी सांगाडा आढळला. अज्ञात मानवी सांगाड्याच्या अंगावर पांढरे शर्ट आणि काळी हाप पॅन्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मानवत पोलिसांकडून अज्ञात मानवी सांगाड्याचा शोध सुरू आहे.
-
-
धाराशिव जिल्ह्यातील 13 प्रकल्पातील पाणीसाठा राखीव, संभाव्य “एल निनो’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क
धाराशिव, भूम, वाशी आणि परंडा या तालुक्यातील पाटबंधारे विभागाच्या 13 प्रकल्पातील पाणीसाठा राखीव आहे. या प्रकल्पातून अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून निगराणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यामध्ये 16 टक्केच पाणी साठा उपलब्ध आहे.
-
जालना जिल्ह्यात 8 ते 10 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता, मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राचा अंदाज
मुंबई येथील प्रादेशिक हवामान क्षेत्राकडून जालना जिल्ह्याला आज पासून तर 10 जून पर्यंत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले. दरम्यान पावसामुळे शेतीमालाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी माल सुरक्षित झाकून ठेवावा विजांपासून संरक्षण करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात
-
पोहता येत नसतानाही तलावात उतरवले… 12 वर्षीय आदित्यचा दुर्दैवी मृत्यू
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कोकळे येथील आदित्य विकास ओलेकर वय 12 याचा आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूलच्या जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. आदित्यला पोहता येत नसल्याची माहिती पालकांनी शाळेला पूर्वीच दिली होती. असे असतानाही त्याला इतर विद्यार्थ्यांसोबत तलावात उतरविण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच आदित्यचा जीव गेल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर मृत विद्यार्थ्याचे वडील विकास ओलेकर यांच्या फिर्यादीवरून संजयनगर पोलिसांनी शाळा प्रशासनाचे दीपक सदलगे आणि विजय कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
-
-
टीसीएसमधील कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात अजून एक नवा खुलासा
मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. “होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे रीतसर प्रशिक्षण दिले,” अशी कबुली तिने दिली. या कबुलीमुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याची चर्चा सुरु आहे. तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून, सर्व गुन्हा संदर्भात नाशिक पोलिसांनी दोषारोप पत्र देखील दाखल केले आहेत.
-
मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना मुलीच्या आईचं प्रियकरासोबत पलायन
मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना मुलीच्या आईने प्रियकरासोबत पलायन करून स्वतःचेच लग्न उरकले आहे. जळगावच्या जामनेर शहरातील धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आईंच्या प्रियकराने लग्नाचे फोटो ‘स्टेटस’ वर ठेवल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. फोटो पाहून संबंधित महिलेच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला. यानंतर हतबल महिलेचा पती थेट जामनेर पोलिस ठाण्यात पोहोचला. पाच दिवसांवर मुलीचा साखरपुडा आहे, समाजात आमची नाचक्की होत आहे. कृपया त्यांना ते मोबाइलवरील स्टेटस काढायला सांगा,’ अशी केविलवाणी विनंती पतीने पोलिसांकडे केली. पतीची ही व्यथा ऐकून पोलिसांनी तातडीने प्रियकराला पोलिस ठाण्यात बोलवून घेत योग्य ती समज दिल्यावर प्रकरणावर पडदा पडल्याची माहिती समोर येत आहे.
-
-
सोलापुरात काकानेच केला पाच वर्षीय पुतण्याचा खून
गळा आवळून खून केल्यानंतर पुतण्या घराच्या पत्र्यावरून पडल्याचा बनाव करत काकाने कांगावा केला. समर्थ कास्तार असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. तर अंकुश कास्तार असे आरोपी काकाचे नाव असून त्याला मंद्रूप पोलिसांनी ताब्यात घेतला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलिस स्टेशनं मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. चिमुकल्या समर्थला काका अंकुशने घरी बोलावले आणि थोड्यावेळाने तो पत्र्यावरून पडल्याचा बनाव करत त्याला घरी घेऊन आला. त्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान चिमुकल्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यात त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले.
-
धाराशिव जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
कळंब, तुळजापूर, उमरगा,वाशी, भुम तालुक्यात मुसळधार पाऊस झाला आहे. मृग नक्षत्राच्या सुरूवातीलाच मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. कळंब तालुक्यातील कळंब लातुर रोडवरील खडकी येथील पर्यायी रस्ता गेला वाहून तर उमरग्यात देखील दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
-
सोलापुरात दीडशे कलाकारांनी पुन्हा जिवंत केला शिवराज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने अस्तित्व मेकर यांच्यातर्फे शिवबा ते छत्रपती या संगीत नृत्य नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या संगीतनाट्यातील राज्याभिषेक सोहळ्यामध्ये एकूण 150 कलाकारांनी एकत्रित येत आपला कलाविष्कार सादर केला. सोहळ्यात शिवकालीन इतिहास संस्कृती आणि मराठी अस्मितेचा अपूर्व काळ पाहून उपस्थित रसिक मंडळी भारावली. यामध्ये पाच वर्ष ते पन्नास वर्षे वयोगटातील कलाकारांचा यामध्ये सहभाग होता. ‘अस्तित्व मेकर’च्या वतीने कलाकारांचा 60 दिवस सराव सुरू होता. हा संगीत नृत्य नाट्य कलाविष्कार पाहण्यासाठी सोलापूरकरांनी तुडुंब गर्दी केली होती.
तीर्थक्षेत्र तुळजापुर आणि परिसरात रात्री उशिरा मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस झाल्याने तुळजाभवानी मंदिर परिसर देखील न्हाऊन निघाला. तर दुसरीकडे देशातील विदा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यात मुंबईने आघाडी घेतली आहे. देशभरातील एकूण विदा केंद्र क्षमतेपैकी जवळपास निम्मी म्हणजेच 766 मेगावॉट एकट्या मुंबईत आहे. याच वेळी पुण्यातील विदा केंद्र क्षमता 145 मेगावॉटवर पोहोचली आहेत. पोलिसांकडून देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे. सोनसाखळी चोरट्यांना दोन तासांत पोलिसांनी अटक केली आहे. रस्त्यावरून पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून काढणाऱ्या तीन सराईत आरोपींना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून मुद्देमाल जप्त केला आहे. यासह देश, क्रीडा, मनोरंजन तसेच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट इथं वाचा.
Published On - Jun 08,2026 8:03 AM
