वाहनं जपून चालवा… आता तुमच्यावर तिसऱ्या डोळ्याची नजर, कोस्टल रोडवर बसवले सीसीटीव्ही
मुंबई किनारी रस्त्यावर 236सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे अपघात ओळखणे, वाहनांची संख्या मोजणे आणि वेगमर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनांची ओळख करण्यासाठी वापरले जातात. या प्रणालीमुळे अपघातांमध्ये त्वरित मदत मिळेल आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारेल.

यंदाचा बृहन्मुंबई महानगरपालिकेने उभारलेला महत्त्वाकांक्षी प्रकल्प धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) हा वाहतुकीच्या दृष्टीने पूर्ण होवून वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने या प्रकल्पावर ठिकठिकाणी मिळून, निरनिराळी वैशिष्ट्ये असलेले 236 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत.
या प्रणालीमुळे मुंबई किनारी रस्त्यावर कोठेही अपघात झाला तर नियंत्रण कक्षाला त्याची त्वरित माहिती मिळते आणि अपघातग्रस्तांना मदत उपलब्ध होते. तसेच दिवसभरात किती वाहनांनी या मार्गाचा वापर केला, त्या वाहनांचे प्रकार कोणते, किती वाहनांनी वेगाची मर्यादा ओलांडली, याचीही नोंद या कॅमेरा प्रणालीमुळे ठेवण्यात येत आहे. मुंबईकरांना जलद, सुलभ आणि सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, हा दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई किनारी रस्ता प्रकल्प उभारला आहे.
शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वरळी-वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची लांबी 10.58 किलोमीटर इतकी आहे. या प्रकल्पावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण प्रकल्पावर ठिकठिकाणी विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल) ते वरळी वांद्रे सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत चार प्रकारचे वैशिष्ट्य असलेले, एकूण 236 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित झाले आहेत.
असे आहेत कॅमेरे आणि त्यांची वैशिष्ट्ये
१. अपघात ओळखणारे कॅमेरे (Video Incident Detection Camera)
मुंबई किनारी रस्त्या प्रकल्पात जुळे बोगदे बांधण्यात आले आहेत. या दोन्ही बोगद्यांमधील आंतरमार्गिका जवळ प्रत्येकी 50मीटर अंतरावर अपघात ओळखणारे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दोन्ही बोगदे मिळून असे एकूण 154कॅमेरे आहेत. जुळ्या बोगद्यांमध्ये कार अपघात, चुकीच्या दिशेने जाणारी वाहने इत्यादी घटनांची हे कॅमेरे आपोआप ओळख करतात. तसेच अशी घटना घडल्यानंतर नियंत्रण कक्षाला तात्काळ सूचना देतात.
२. निगराणी कॅमेरे (PTZ Camera)
सामान्यपणे वाहतूक सुरक्षेसाठी 71निगराणी कॅमेरे बसविले आहेत. हे कॅमेरे फिरवता, झुकवता व झूम करता येतात. जेव्हा एखादा अपघात होतो तेव्हा या कॅमेऱ्यामधील व्हीआयडीएस प्रणाली (Video Incident Detection System) स्वयंचलित पद्धतीने सदर घटना ओळखते आणि आपोआप त्या घटनेकडे लक्ष केंद्रित करते. दोन्ही भूमिगत बोगद्यांमध्ये असे 71कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
३. वाहन मोजणी कॅमेरे (ATCC Camera)
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील भूमिगत बोगद्यांचे प्रवेशद्वार व निर्गमद्वारावर (Entry & Exit) एकूण चार कॅमेरे बसविण्यात आले आहेत. भूमिगत बोगद्यांमध्ये जाणाऱ्या वाहनांची संख्या मोजणे, त्यांचे वर्गीकरण करणे, यासाठी हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
४. वाहन क्रमांक ओळखणारे कॅमेरे (Automatic Number Plate Camera)
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा नव्यानेच उभारण्यात आला असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि अशी वाहने ओळखण्यासाठी सात कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांची छायाचित्रे व त्यांच्या वाहन क्रमांकाची (नंबर प्लेट) नोंद हे कॅमेरे करतात.
मुंबई सागरी किनारी रस्त्यावर वेगमर्यादांचे पालन न करणे, शर्यती लावणे, आवाज नियंत्रणात न ठेवणे अशा तक्रारी स्थानिकांकडून प्राप्त होत होत्या. कॅमेरे लावल्यामुळे महानगरपालिका तसेच वाहतूक पोलिस यांना या प्रकारांवर नियंत्रण ठेवता येईल. हे कॅमेरे कार्यान्वित झाल्यामुळे आता हा महामार्ग 24तास सुरू ठेवण्याचे महानगरपालिका प्रशासनाने नियोजन पूर्ण झाले आहे.
या सुविधेमुळे मुंबई किनारी रस्ता प्रकल्पावरील संभाव्य अपघात टाळण्यासाठी तसेच दुर्दैवाने अपघात घडल्यास त्यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी मदत होत आहे. मुंबई किनारी रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व वाहन चालकांनी वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
