Rain Updates : मुंबईकरांनो छत्र्या बाहेर काढा ! दडी मारलेल्या पावसाचं मुंबईत कमबॅक; 16 ते 18 जुलैपर्यंत…
मुंबईकर आतुरतेने पावसाची वाट पाहत असताना हवामान विभागाने (IMD) दिलासा देणारी बातमी दिली आहे. आज बुधवारपासून मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून दिवसभर ढगाळ वातावरण राहील. तापमान आल्हाददायक राहील. तसेच 16 ते 20 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरूणाराजाची राज्यभरातील नागिरक आतुरतेने वाट पहात असून मुंबईकरांनाही पावसाची आस लागली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सलग, धो-धो कोसणाऱ्या पावसाने थैमान घातलं होतं, नद्याची पातळी वाढलवी, अनेक ठिकाणी पाणी साचलं, नागिरकांचीही त्रेधा-तिरपीट उडाली. मात्र माग्चाय 5-6 दिवसांपासून पावसाचं नामोनिशाण नसून जुलैची 15 तारीख उजाडूनही पाऊस न आल्याने अनेकांची चिंता वाढली. मुंबईकरंच्या घामाच्या धारा पुन्हा वाहू लागल्या असून मुंबईकर पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत. त्यांच्यासाठी बुधवारची सकाळ एक गुड न्यूज घेऊन आली आहे. शहरात आज सकाळपासूनच दाट ढगांनी आकाश व्यापले असून दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून काही भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर फारसा वाढणार नसला तरी हवेत आर्द्रता आणि गारवा जाणवण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागानाकडून करण्यात आला आहे.
मुंबईत जाणवणार आल्हाददायक वातावरण
तसेच आज मुंबईतील कमाल तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, तर किमान तापमान सुमारे 27 अंश सेल्सिअसपर्यंत राहू शकेल. नैऋत्य दिशेकडून ताशी 18 ते 23 किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने वातावरण तुलनेने थंड आणि आल्हाददायक राहणार आहे.
पुढील काही दिवस मुंबईत पावसाची शक्यता कायम
दरम्यान, 16 ते 18 जुलैदरम्यान मुंबईत ढगाळ वातावरण कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 16 जुलै रोजी दुपारनंतर तसेच रात्रीच्या वेळी काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. तर 17 जुलै रोजी मुंबईत अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू राहण्याची शक्यता असून, 18 ते 20 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांना सतर्कतेचा सल्ला
सध्या मुंबईसाठी हवामान विभागाकडून कोणताही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. मात्र, मान्सूनच्या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनाने पावसाळी परिस्थिती लक्षात घेऊन नाले, वाहतूक व्यवस्था आणि सखल भागांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि पावसाच्या काळात सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
