आपण पाकिस्तान होत चाललो आहोत : भालचंद्र नेमाडे
ज्ञानपीठ विजेते लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी देशात सुरु असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेली आंदोलनं म्हणजे अराजकतेची लक्षणं असल्याचं अप्रत्यक्ष विधान केलं आहे (Bhalchandra Nemade on NRC CAA ).
मुंबई : ज्ञानपीठ विजेते लेखक आणि ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी देशात सुरु असलेल्या नागरिकत्व कायद्याविरोधात सुरु असलेली आंदोलनं म्हणजे अराजकतेची लक्षणं असल्याचं अप्रत्यक्ष विधान केलं आहे (Bhalchandra Nemade on NRC CAA ). आपली वाटचाल हिंसक पद्धतीने चालली असून आपण पाकिस्तान होत चाललो आहोत, असंही नेमाडे यांनी यावेळी म्हटलं.
भालचंद्र नेमाडे म्हणाले, “हे अराजकतेचं लक्षण आहे आणि हे वाढतच जाणार आहे. कारण आपल्याला यातून बाहेर पडता येणं कठीण आहे. आता आपली वाटचाल अतिशय हिंसक पद्धतीने सुरु आहे, असं मला वाटतं. आपल्या देशात असं कधी नव्हतं. दुर्दैवाने आपण पाकिस्तान होत चाललो आहोत.”
नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हा खूप तज्ञ लोकांचा उद्योग आहे. राजकारणी लोकांचा हा विषय नाही. आपल्या देशात गुप्तहेर, दहशतवादी, त्या देशातून हाकलून दिलेले गरिब-अनाथ आणि हा देश आवडतो म्हणून येणारे असे 100 प्रकारचे लोक येतात. त्या सर्वांना एकाच मापाने मोजणं बरोबर नाही. ज्यांना यायचं त्यांना येऊ द्यावं. सरकारची इतकी मोठी यंत्रणा आहे. त्यावर इतका खर्च होतो. त्यामुळे त्यातील दहशतवादी कोण आहेत हे शोधणं सरकारचं काम आहे. मात्र, कोणत्याही गरिब नागरिकाला या देशाचं नागरिक होऊ नको म्हणणे योग्य नाही, असंही भालचंद्र नेमाडे यांनी नमूद केलं.
“हा घाणेरड्या लोकांचा उद्योग, चांगल्या लोकांना यात घालू नये”
भालचंद्र नेमाडे म्हणाले, “सर्वसामान्य माणसाने आपलं आयुष्य नीट काढावं इतकीच आपली अपेक्षा असते. हा घाणेरड्या लोकांचा उद्योग असतो. चांगल्या लोकांना यात घालू नये असं मला वाटतं. खरं म्हणजे हा विषय इतका विद्यार्थ्यांपर्यंत जाणं हेही चूकीचं आहे. हे ठराविक तज्ञ लोकांनी सोडवावे असे प्रश्न आहेत. दुर्दैवाने लोक रस्त्यावर यायला लागली आहेत. त्यामुळे सर्वांनीच आपली कामं सोडून या घाणेरड्या धंद्यात पडा, असा हा उद्योग झाला आहे.”
सरकारला सल्ला देण्याची गरज नाही. त्यांना अशा सल्ल्यांची गरज नसते. त्यांचं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बरोबर ठरलेलं असतं, असंही नेमाडे यांनी म्हटलं.