काँग्रेस पक्ष हेडलेस, भाजप फायदा घेतंय, अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावा; संजय राऊतांचा सल्ला
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्ष हेडलेस झाला आहे. त्याचा भाजप फायदा घेत आहे. (congress should appoint party president, says sanjay raut)
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्ष हेडलेस झाला आहे. त्याचा भाजप फायदा घेत आहे. त्यामुळे काँग्रेसने अध्यक्षपदाचा विषय मार्गी लावावा, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सल्ला दिला. जोपर्यंत काँग्रेस पक्षाला कोणी अध्यक्ष नियुक्त केला जात नाही, तोपर्यंत आज जो काही गोंधळ सुरू आहे तो थांबणार नाही असं माझ्यासारख्या राजकीय विश्लेषकाला वाटतं. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस हेडलेस, नेतृत्वहीन झाली आहे. त्याचा फायदा भाजप घेत आहे. काँग्रेस देशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. तो राहील. भविष्यात राजकारण करताना काँग्रेस शिवाय राजकारण करता येणार नाही. पण काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषय लवकरात लवकर मार्गी लावला तर विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असं राऊत म्हणाले.
तरच काँग्रेसला गती मिळेल
काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे गांधी परिवारच आहे. तरीही पक्षाला अध्यक्ष हवाच. आता शिवसेना पक्षप्रमुख हे आमचे प्रमुख आहेत. आम्ही सर्व काम करतो. पण नेते आहेत ते. प्रमुख पदावर एक नेता असतो, तो बसून दिशानिर्देशन करत असतो. पक्षाला असा कोणी जर प्रमुख असेल तर त्यांच्या पक्षाला निश्चित गती मिळेल, असं त्यांनी सांगितलं. पक्षनेतृत्व असेल तर कार्यकर्ते जोमाने काम करतात. नवी ऊर्जा मिळते. भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने अध्यक्ष निवड करणं काळाची गरज आहे, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका
दरम्यान, राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांवर टीका केली आहे. काँग्रेस पक्षात वर्षानुवर्षे पदे भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱ्या म्हातार महामंडळाने ‘जी-23’ नावाचा गट स्थापन केला व ते काँग्रेसची अंतर्गत भांडणे चव्हाट्यावर आणत आहेत. राहुल गांधींनी देशातील ‘जनतेचा आवाज’ बनू नये, असाही या म्हातार महामंडळाचा आग्रह असतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत राहुल यांची तोफ केंद्र सरकारच्या विरोधात सतत धडधडतच असते. मीडियावरूनही मोदी सरकारला घेरण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. बहुधा हेच काँग्रेसमधील या ‘म्हाताऱ्या अर्कां’ना खटकत आहे. त्यामुळेच राहुल यांच्या समोरील अडचणी कशा वाढतच राहतील असा त्यांचा आटापिटा सुरू असतो. हा सगळा खटाटोप राहुल गांधी यांनी आपला सल्ला ऐकावा, पक्षात, सत्तेत जी काही नवी पदे निर्माण होतील ती पुन्हा आपल्यालाच मिळावीत यासाठी सुरू आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आली आहे.
अमरिंदर सिंगांना मांडीवर बसवून काय मिळवणार?
यावेळी त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग आणि भाजपवरही अग्रलेखातून हल्ला चढवला आहे. कॅ. अमरिंदर येतील व जातील. त्यांनी सत्तेची सर्व सुखे काँग्रेस पक्षातच भोगली आहेत. आता भोगायला उरले नाही तरीही खुर्चीचा मोह सुटत नाही. भाजप अशा अमरिंदर सिंगांना मांडीवर बसवून काय मिळवणार?, असा सवाल करतानाच केंद्रीय गृहमंत्र्यांनी पंजाबच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना डावलून काँग्रेसने दूर केलेल्या व आमदारांचा पाठिंबा गमावलेल्या अमरिंदर सिंग यांच्याशी सीमा सुरक्षेबाबत चर्चा करणे बरोबर नाही. देशाच्या गृहमंत्र्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे, पण अमरिंदर आता जी चिंता व्यक्त करीत आहेत त्याप्रमाणे पंजाबच्या सीमेवर काय घडले आहे? लडाख, कश्मीर सीमेप्रमाणे त्या सीमेवरही कोणी घुसखोरी करू लागले आहे काय? कुठे चीन तर कुठे पाकिस्तान रोज घुसखोरी करीत आहे, पण मुख्यमंत्रीपद गेल्यावर अमरिंदर यांना सीमा सुरक्षेबाबत जाग आली. देशाच्या गृहमंत्र्यांनाही त्याबद्दल जी बहुमोल माहिती मिळाली ती देशाला समजेल काय? राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यानेच अमरिंदर यांच्याप्रमाणेच आम्हालाही चिंता वाटते, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 02 October 2021 https://t.co/wlr86RpD8v #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 2, 2021
संबंधित बातम्या:
आघाडीच्या स्थापनेपासून भाकीतं होताहेत, भाजपने ज्योतिषी बदलावा; बाळासाहेब थोरांताचा खोचक टोला
गडकरी पवारांचा एकत्रित हवाई प्रवास, विखे स्वागताला सज्ज, नगरच्या कार्यक्रमाकडे महाराष्ट्राचं लक्ष!
(congress should appoint party president, says sanjay raut)