Rain: भिजपावसातही शेताचे होते डबके? कुजतात पिके? मग हा उपाय कराच
Waterlogged in farm During Heavy Rain: दोन तासाच्या रिमझिम पावसाने अथवा भिजपावसाने जर शेतात पाणी साचत असेल तर मग सावध व्हा. कारण असे प्रकार वारंवार घडत असेल तर पिक वाया जाईलच. पण तुमची मेहनत आणि कष्टाचा पैसाही वाया जातो. काय कराल उपाय?

Waterlogged in farm: अल निनोला वाकुल्या दाखवत पावसाने दिमाखात सुरूवात केली. शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. पाऊस आल्यानंतर शेतकरी आनंदून जातो. पण या आनंदाबरोबरच एक चिंताही त्याला सतावते. मुसळधार पावसानेच नाही तर अगदी काही तासांच्या भिजपावसाने, रिमझिममुळे सुद्धा काहींच्या शेतात पाणी थांबते. शेताचे पार डबके होते. पिके कुजण्याची भीती निर्माण होते. पिके खराब होण्यास हा पाऊस कारणीभूत ठरत नाही. जमिनीचा पोतही तितकाच कारणीभूत ठरतो.
रासायनिक खतांच्या वापरामुळे जमीन होते कठीण
उत्पादन वाढीसाठी गेल्या काही वर्षात शेतात युरिया, डीएपी या रासायनिक खतांचा वारेमाफ वापर सुरू आहे. यामुळे जमिनीची गुणवत्ता रसातळाला गेली आहे. जमिनीचा पोत खराब झाला आहे. रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे जमिनीतील सुक्ष्मजीव नष्ट होत आहेत. जमीन भुसभुशीत होण्याऐवजी ती कठीण झाली आहे.
शेताचे होते मग डबके
रसायनांच्या अतिरेकामुळे जमीन कठीण होते. पावसाचे पाणी सहजपणे जमिनीत मुरत नाही. पाणी शेतात साचते. पिकांच्या मुळांना आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही. पिके हळूहळू कोमेजतात. करपतात आणि जळून जातात.
एकदम घरगुती उपाय
शेताला डबकं होऊ द्यायचे नसेल तर रासायनिक खताला पर्याय शोधणे आवश्यक आहे. नैसर्गिक शेती जमिनीला नवीन जीवदान देते. जीवामृत, घनजीवामृत आणि इतर नैसर्गिक पद्धतीचा वापराने जमिनीतील सूक्ष्मजीव पुन्हा सक्रिय होतात. नैसर्गिक खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची गुणवत्ता सुधारते. तिची सुपिकता टिकते.
गांडूळ म्हणजे जमिनीचे नैसर्गिक अभियंते
नैसर्गिक शेतीत गांडुळाला महत्त्व आहे. गांडुळामुळे जमीन भुसभुशीत होते. जमिनीत छोटी छोटी छिद्रे तयार होतात. जमीन स्पंजासारखी होते. मुसळधार पावसाचे पाणीही झरकन जमिनीत मुरते. ते पाणी पृष्ठभागावर थांबत नाही. जमिनीत मुरते.
रासायनिक शेतीमुळे जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता संपते. तर नैसर्गिक शेतीमुळे जमीन भुसभुशीत होते. पाणी साठवण्याची क्षमता वाढते. पाणी पातळी वाढते. शेतातील ओल टिकून राहते. अति पाण्याचा निचरा झाल्याने पिकांचे कोणतेही नुकसान होत नाही. पिक नष्ट होत नाही. त्याची मूळं सडत नाहीत. ज्या ठिकाणी अतिवृष्टी होते अथवा रसायनांचा अतिरेक झाल्याने शेतात पाणी साठते. त्याठिकाणी नैसर्गिक शेतीकडे वळणे हा सर्वात चांगला उपाय मानल्या जातो. पिक वाढीसाठी आणि अधिक उत्पादनासाठी नैसर्गिक खतांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते.
डिस्क्लेमर: विविध स्त्रोतांवरून शेतकऱ्यांसाठी ही माहिती देण्यात आली आहे. TV9 मराठी या माहितीला दुजोरा देत नाही. शेतीतज्ज्ञ अथवा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, माहितीगाराची मदत नक्की घ्या.
