MNS Candidates BMC Election 2026 : मनसे किती जागा लढवतेय? AB फॉर्मचं वाटप कधी करणार? बाळा नांदगावकरांचं उत्तर काय?
"त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला जाऊन उमेदवारी अर्ज भरायचा आहे. प्रचारात पूर्णपणे सहभागी होऊन काम करायचं आहे. शिवसेना-मनसेचा उमेदवार असेल त्याला मदत करायची आहे. असा संदेश राज ठाकरेंनी कोअर टीमला दिला आहे"

मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी विविध पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. भाजपने त्यांची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा उमेदवारांची नाव जाहीर झाली आहेत. त्यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. पण मनसेकडून अजून कोणाला एबी फॉर्म देण्यात आल्याची चर्चा नाहीय. मनसे किती जागांवर निवडणूक लढवणार? त्या बद्दल सुद्धा कुठली ठोस माहिती नाहीय. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते या विषयांवर बोलले. “देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी खासकरुन मराठी माणसासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. निवडणुका येतात आणि जातात. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायची, तशा प्रकारची आखणी करुन प्लानिंग सुरु झालेलं आहे. बाकी गोष्टी क्षुल्लक आहेत“ असं बाळा नांदगावकर म्हणाले.
“मुंबई आपल्या हातात राहिली पाहिजे. मुंबई वेगळी करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न उद्धवस्त करा. मुंबई मराठी माणसाची, महाराष्ट्राची आहे. भांडणापेक्षा आणि वादापेक्षा आपल्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. निवडणूक जोशात लढवायची आहे. मुंबई आपल्याला सत्ता राखायची आहे. सीट इकडून तिकडे होतात. मागच्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदा आपण युतीमध्ये निवडणूक लढतोय. युती धर्म पाळायचा आहे“ असं बाळा नांदगावकर म्हणाले.
राज ठाकरेंचा संदेश काय?
“प्रत्येक जागा ही मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी महत्त्वाची आहे. ही निवडणूक अस्तित्वाची आहे. मराठी माणसासाठी मुंबई वाचवायची आहे. कार्यकर्त्यांनी आपपाल्या मतदारसंघात उमेदवार फॉर्म भरताना त्यांच्यासोबत राहा. एनसीपी सुद्धा आपल्या सोबत आहे. त्यांच्यासोबत सुद्धा आपल्याला जाऊन उमेदवारी अर्ज भरायचा आहे. प्रचारात पूर्णपणे सहभागी होऊन काम करायचं आहे. शिवसेना-मनसेचा उमेदवार असेल त्याला मदत करायची आहे. असा संदेश राज ठाकरेंनी कोअर टीमला दिला आहे“ असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं.
त्यांचं भविष्य उज्वल आहे
‘मनसेकडून एबी फॉर्म दिले जातील. राजगड कार्यालयातून एबी फॉर्म दिले जातील‘ असं बाळा नांदगावकर म्हणाले. मनसे किती जागांवर निवडणूक लढवत आहे? या प्रश्नावर त्यांनी एबी फॉर्म आल्यावर तुम्हाला समजेलच असं उत्तर दिलं. “आतापर्यंत आमच्या पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवलेल्या आहेत. काही सीट इकडच्या तिकडे होतात. नाराजी जशी आमच्याकडे होईल, तशी त्यांच्याकडे होईल. पण कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये. कारण अशा निवडणुका ठाकरे बंधु वारंवार लढवणार आहेत. त्यांचं भविष्य उज्वल आहे“ असं बाळा नांदगावकर म्हणाले.
