Manoj Jarange: मनोज जरांगेंचा अल्टिमेटम आज संपणार… सहा दिवसानंतर सरकारचा काय प्रतिसाद? मागण्या मंजूर होणार?
Manoj Jarange Patil on Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यांचा अल्टिमेटम आज संपत आहेत. सरकारने काय दिला प्रतिसाद?

Manoj Jarange Patil on Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भातील काही मागण्या मान्य न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आमदार प्रसाद लाड यांनी 22 मे रोजी अंतरवाली सराटी जवळ केली. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. माध्यमांसमोर आणि नंतर बंद खोलीतही चर्चा झाली. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे आश्वासन देत लाड मुंबईकडे रवाना झाले. आज जरागें पाटील यांचा अल्टिमेटम संपत आला आहे. सहा दिवस झाल्यानंतर थोड्या वेळापूर्वी आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया दिली. उद्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. आता 10:30 वाजता मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकार आश्वासन पाळणार?
मनोज जरांगे पाटील यांना आता उपोषणाची वेळ येणार नाही असे आश्वासन प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटीत दिले होते. सरकार दरबारी आपण मनोज जरांगे पाटील यांचे मुद्दे मांडू आणि प्रशासकीय वा इतर अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा अंतरवाली सराटीत येऊ असे आश्वासन त्यांनी दिले होते. थोड्या वेळापूर्वी आमदार प्रसाद लाड यांनी आपण त्यांना आश्वासन दिले होते. 30 मे रोजीचे उपोषण न करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत त्यांची भेट घेणार असल्याचे लाड यांनी सांगितले. आता आजच्या अंतरवाली सराटीतील पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.
31 मेपासून आमरण उपोषण?
उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर पावसाळा सुरू होत असल्याने शेतकऱ्यांच्या मशागतीची कामे सुरू होतील, शाळा सुरू होतील, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये असे आवाहन आमदार प्रसाद लाड यांनी 22 मे रोजी केले होते. मराठा समाजाच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. तर काही गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ही ते म्हणाले होते. त्यांनी जरांगे यांच्यावर उपोषणाची वेळ येणार नसल्याचेही म्हटले होते. पण गेल्या सहा दिवसात सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्याचे समोर येत आहे. तर उद्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे त्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे आता 31 मेपासून आमरण उपोषणाला बसणार का? की आंदोलनाची दुसरी दिशा ठरवली जाणार हे थोड्याच वेळात समोर येणार आहे. अंतरवाली सराटीत साडेदहा वाजता जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होत आहे.
मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे अपेक्षित उत्तर मनोजदादांना मिळेल! – आमदार प्रसाद लाड
मराठा उपसमितीचे अध्यक्ष, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे 29 मे रोजी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. इतर समाजाच्या आरक्षणाला न धक्का लागता तोडगा काढण्यात येईल आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे अपेक्षित उत्तर मनोजदादांना मिळेल अशी सूचक प्रतिक्रिया आमदार प्रसाद लाड यांनी दिली.
