BEST Election : शशांक राव यांचा ‘बेस्ट’ पंच; लढले विरोधात, निवडून येताच भाजपचे गुणगान
BEST Election Shashank Rao : तर पहिल्या लिटमस टेस्टमध्ये ठाकरे बंधू सपशेल फेल ठरले. त्यांना बेस्ट कर्मचारी सहकारी क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर शशांक राव यांच्या बेस्ट पंचची एकच चर्चा रंगली आहे.

ठाकरे बंधूंना लिटमस टेस्टमध्ये हरवल्यानंतर शशांक राव यांचा बेस्ट पंच चर्चेचा विषय ठरला आहे. त्यापेक्षा चर्चा होत आहे ती त्यांच्या राजकीय भूमिकेची. दी बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत (Best Election 2025) शशांक राव यांनी घवघवीत यश मिळवले. त्यांच्या पॅनलचे 14 शिलेदार निवडून आले. तर दुसरीकडे प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या सहकार समृद्धी पॅनलचे 7 उमेदवार निवडून आले. 21 जागांपैकी एकही जागा ठाकरे बंधूंना जिंकता आली नाही. या निवडणुकीत महायुतीचे पॅनल आणि शशांक राव यांच्यात थेट सामना रंगला. दोन्ही गटांत शशांक राव यांनी मुसंडी मारली. राव यांच्या पॅनलला 1946 पासूनचा वारसा आहे. देशाचे माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिसपासून ते शरद रावांपर्यंत अनेक दिग्गज कामगार नेत्यांनी त्यांची राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. पण शशांक राव हे एक पाऊल पुढे निघाले.
शशांक राव यांच्या पॅनलला 14 जागा
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी बेस्ट पतपेढीची निवडणूक चर्चेत आली होती. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सेनेने स्वतंत्र पॅनल न देता एकच पॅनल उतरवले होते. बेस्ट उपक्रमाच्या पतपेढीसाठी सोमवारी मतदान झाले. मतमोजणीनंतर ठाकरे ब्रँडला धक्का बसला. शशांक राव आणि सहकार समृद्धीनेच बाजी मारली. या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकल्या.
शशांक राव यांचा मुरब्बीपणा
तर पतपेढी निवडणुकीत मुसंडी मारणाऱ्या शशांक राव यांचे राजकीय मुरब्बीपण दिसून आले. निवडणुकीत त्यांनी महायुतीविरोधात उमेदवार दिले. ते निवडूनही आले. म्हणजे त्यांच्या पॅनलने ठाकरे बंधूसोबतच महायुतीच्या उमेदवाराला सुद्धा टफ फाईट दिली. पण जिंकल्यानंतर शशांक राव यांचा सूर बदलला. त्यांनी लागलीच भाजपच्या पंक्तीला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुती सुमनं उधळली.
शशांक राव यांची ठाकरेंवर टीका
बेस्टमध्ये जो खासगीकरणाचा डाव आहे, तो या निकालाने उधळल्या गेल्याचे शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या बेस्टची जी वाईट स्थिती आहे, त्याला शिवसेना आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव सेना ही गेल्या अनेक वर्षांपासून या समितीत आहे. पण स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी बेस्टचं नुकसान केलं. 9 वर्षांनी ही निवडणूक झाली. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कामगारांच्या कल्याणासाठी न्याय लढा देत आहोत. त्याला आलेलं हे यश आहे, असे राव म्हणाले.
या निवडणुकीत दोन भाऊ एकत्र येणं हा काही मुद्दा नव्हता. कामगारांसाठी जो लढा देईल. त्यांच्या हक्कासाठी लढेल, मग तो एकटा असला तरी त्याला निवडून दिलं जातं, हे आज या निकालाने दाखवून दिलेले आहे. गेल्या 3 वर्षांपासून कामगारांना ग्रॅज्युएटीची रक्कम मिळाली नाही. त्याविरोधात आम्ही मोर्चा काढला होता. त्याची ही पोचपावती आहे.
कोणी कितीही एकत्र आलं आणि त्यांनी कामगारांसाठी जर काम केलं नाही तर त्यांना असेच भोपळे मिळणार असा टोला शशांक राव यांनी लगावला. राव हे गेल्या वर्षी भाजपमध्ये आले होते. तर त्यांचे वडील शरद राव हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होते. या निवडणुकीत शशांक राव यांनी महायुतीच्या पॅनलविरोधात निवडणूक लढवली. आपली कामगार संघटना ही भाजपप्रणीत वा भाजपशी संबंधित नसल्याचा दावा त्यांनी केला. विविध पक्षातील नेते या कामगार संघटनेत अनेक वर्षांपासूनच असल्याचे ते म्हणाले.
आपलं पॅनल बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत उशीरा उतरल्याचे त्यांनी सांगितले. मतांचं विभाजन करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ही या निमित्ताने निकाली निघाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे महापालिका होती. ते मुख्यमंत्री होते. तरीही त्यांनी कामगार हिताचे निर्णय घेतले नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेळोवेळी धावून आल्याचे ते म्हणाले. ही लिटमस टेस्टकडे ठाकरे बंधूंनी गांर्भीयाने घेतली नसल्याचे बोलले जात आहे. आता विविध आरोप-प्रत्यारोप होतील, पण कामगार विश्वासात ठाकरे बंधूंनी विश्वासहर्यता गमावल्याचा संदेश पोहचवण्यात महायुतीला यश आले हे नाकारून चालणार नाही.
