सर्वसामान्यांना महागाईच्या झळा अन्… GDP च्या कौतुक सोहळ्याविरोधात शरद पवार मैदानात, सरकारची काढली खरडपट्टी
Sharad Pawar on GDP Growth Rate: देशात विकास वृद्धी दरावरून (GDP) सध्या मोठा वाद उफाळला आहे. एकीकडे सरकार जीडीपीवरून कौतुक सोहळा करत असताना विरोधकांनी ही आकडेवारी सपशेल खोटी असल्याचा दावा केला आहे. या वादात आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उडी घेतली आहे. त्यांनी सरकारला खरी खोटी सुनावली आहे.

भारताचा विकास वृद्धी दर (GDP) एप्रिल ते जून या तिमाहीत 7.8 टक्के इतका असल्याचे सरकारने जाहीर केले. एकीकडे महागाईचा भडका उडाल्याचे सांगत विरोधकांनी जीडीपीची ही आकडेवारी सपशेल खोटी असल्याचा दावा केला आहे. काँग्रेससह विरोधकांनी सरकारच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकार विकास दर वृद्धीवरून कौतुक सोहळा साजरा करत असताना विरोधकांनी मोर्चा उघडला आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही उडी घेतली आहे. त्यांनी सरकारला वस्तुस्थितीची जाणीव करून देत चांगलेच खडसावले आहे.
शरद पवार यांनी टोचले सरकारचे कान
देशाचे अर्थमंत्री आणि प्रधानमंत्री अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय सुंदर आहे, असं भासवायचा प्रयत्न करत आहेत. मूळ जे दुखणं आहे हे त्यांच्या लेखी नाही. अर्थव्यवस्था खाली जाते याची नोंद त्यांनी घेतलेली नाही, असं दिसतंय अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रधानमंत्री आंतरराष्ट्रीय पातळीवर काही गोष्टी बोलत आहेत. आज इथली वस्तूस्थिती आहे ती एका दृष्टीने बाजूला ठेवली आहे. तुमच्या खिशातून पैसे जास्त जातील. तुम्हाला महागाईच्या झळा बसतील, असे भाष्य पवार यांनी केले.
काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी जीडीपीवरून सरकारला घेरले आहे. जीडीपी मोजण्याच्या नवीन पद्धतीवरून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. केरळ काँग्रेसने सोशल मीडियावर एक पोस्ट करत जीडीपीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. बिअरच्या मगचे उदाहरण देत जीडीपीवरून सरकारवर निशाणा साधला आहे. या फोटोत भारतीय अर्थव्यवस्थेला बिअरच्या रुपात तर GDP आकेडवारीला बिअरवरील फेसाच्या रुपात दर्शवले आहे. महागाईने जनतेचे कंबरडे मोडले असताना जीडीपीची फसवी आकडेवारी समोर करत सरकार नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
सरकारचा विरोधकांवर पलटवार
देशाच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) भारताचा विकास वृद्धी दर 7.8 टक्के असल्याचे जाहीर केले. त्यावर माजी वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग आणि इतर काही अर्थतज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी जीडीपी गणना आणि मोजणी पद्धतीवर आक्षेप घेतला आहे. गेल्या काही वर्षात त्यात सरकारने बदल केल्यानेच ही आकडेवारी फुगल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.
तर मोदी सरकारामधूनही विरोधकांवर टीकेचे बाण सोडण्यात येत आहे. काँग्रेस सध्या नशेच्या गर्तेत आहे. त्यांना भारतीय विकासाचे वावडे आहे. देशाची प्रगती काँग्रेसला सहन होत नसल्याचा दावा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. तर सांख्यिकी विभागानेही सरकारच्या वतीने विरोधकांच्या आक्षेपांवर उत्तर दिले आहे. पण त्याने विरोधकांचे समाधान झालेले नाही. सरकार आकडेवारीचा खेळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
