Raj Thackeray: सर्रास लहान मुलं पळवतायेत… कारवाई काय? गंभीर प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारवर संताप, मुख्यमंत्र्यांना थेट पत्र, पत्रात काय काय?
Raj Thackeray to Devendra Fadnavis: राज्यात लहान मुलांना पळवले जात असताना सरकार आणि प्रशासन काय करतंय असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रच धाडले आहे. काय काय आहे या पत्रात?

Raj Thackeray Letter to CM Devendra Fadnavis: राज्यात टोळ्या सर्रास लहान मुलांना पळवतायेत, सराकर तिकडं हिवाळी अधिवेशनात पुरवण्या मंजूर करण्यात गुंतलंय अशी खरमरीत चपराक राज ठाकरे यांनी लगावली आहे. त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुलांना पळवणाऱ्या अनेक अंतरराज्य टोळ्या असल्याचे सांगत त्यांनी काय कारवाई करण्यात येत आहे हेच समजत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र धाडलं आहे. या पत्रात त्यांनी राज्यातील गंभीर मुद्याला थेट हात घातला आहे.
काय म्हटलंय राज ठाकरेंनी पत्रात
“एका अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर विषयाकडे तुमचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे लिहीत आहे. महाराष्ट्रात लहान मुलं पळवण्याचं, ती बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढतं आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार जरी गेलं तरी हे प्रमाण २०२१ ते २०२४ या काळात जवळपास ३०% नी वाढलं आहे. लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत. आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही…
लहान मुलं पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात अशा आशयाचं सरकारी उत्तर यावर महाराष्ट्राला नको आहे. मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो, पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचत तरी असतील का ? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय ? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते ?
यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला वाटत नाही ? आज आपण रस्त्यावर, स्टेशनवर, बसस्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ?” असा सवाल त्यांनी विचारला.
“आज या राज्यात लहान मुलं पळवली जात आहेत, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावं असं सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राची ही अपेक्षा आहे. खरंतर केंद्र सरकारने हा विषय सगळ्या राज्यांशी बोलून या विषयात कृतिगट तयार करायला हवा, पण सध्या वंदे मातरम वर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नाही ! असो. आज राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालून, फक्त अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर काहीतरी ठोस कृती करावी ही महाराष्ट्राची तुमच्याकडून अपेक्षा आहे.” अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.
