राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा; निकाला आधीच ठाकरे गटाच्या आमदाराची धक्कादायक मागणी
शिवसेना आमदाराच्या अपात्रतेवर आज निर्णय होत आहे. यावेळी निकाल कुणाच्या बाजूने जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे. विधानसभा अध्यक्ष कोणत्या गटाच्या बाजूने निर्णय देतात याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. विधानभवनात हालचालींना वेग आला आहे. दोन्ही गटाचे आमदार आणि वकीलही विधानभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे सर्वांचे कान निकालाकडे टवकारले गेले आहेत.
गणेश सोनोने, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, अकोला | 10 जानेवारी 2024 : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर कोणत्याही वेळी निर्णय येणार आहे. यावेळी काय घडेल हे सांगता येत नाही. आमच्याच बाजूने निकाल लागणार असं दोन्ही गटातील नेत्यांना वाटत आहे. तसे दावेही केले जात आहे. तसेच निकालाच्या आधी शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोपही करत आहेत. या निकालापूर्वीच ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी एक मागणी करून खळबळ उडवून दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणीच नितीन देशमुख यांनी केली आहे.
आज 16 आमदारांच्या पात्र अपात्रतेवर निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे नेते जे सांगतील तोच निकाल राहुल नार्वेकर देणार आहेत. त्यामुळे नार्वेकर यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. त्यांची नार्को टेस्ट केल्यास सर्व निकाल बाहेर येईल, असं नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख यांच्या या धक्कादायक मागणीने एकच खळबळ उडाली आहे.
म्हणून नार्को टेस्ट करणं महत्त्वाचं
विधानसभेच्या अध्यक्षांना न्यायाधीशाचा दर्जा होता. कायदेशीर प्रक्रिया सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जाणं आणि वारंवार दिल्ली दरबारी हजेरी लावणं आणि विचारपूस करून निर्णय देणं हे लोकशाहीला घातक आहे. म्हणून नार्वेकर यांची नार्को टेस्ट केली पाहिजे. ते अतिमहत्त्वाचं आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
निकाल दोन दिवसाआधीच समजला
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे आमदार मला भेटले होते. त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अपात्र होतील असं मला सांगितलं. दोन दिवसांपूर्वीच त्यांना निकाल समजला होता. ही मॅच फिक्स झाली आहे. कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध बोलणे योग्य नाही, पण नाईलाजाने आम्हाला बोलावे लागत आहे. निकालात काही उत्सुकता नाही, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ. हा निकाल झाला आहे. जर आम्ही अपात्र झालो तर पक्ष त्याबाबत ठरवेल. जे काही होईल त्याला आम्ही सामोरे जाऊ. जनतेला उद्धव ठाकरे यांची भूमिका मान्य आहे, असं वैभव नाईक म्हणाले.