मोदी, शाहांना हटवून मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच; काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधानपदाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काकांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, वडेट्टीवार म्हणाले की, जर नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवून एखादा मराठी माणूस पंतप्रधान झाला तर त्यांना आनंदच होईल. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे.

माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकांनी केलं होतं. त्यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना हटवून मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर आनंदच आहे, असं सूचक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. वडेट्टीवार यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे सूचक विधान केलं. मुख्यमंत्री फडणवीस हे पंतप्रधान व्हावेत हे त्यांच्या नातेवाईकांना, भावाला वाटणे स्वभाविक आहे. मात्र ते ठरवणारे गुजरातचे दोन आहेत. आमची सत्ता आली तर आमचे नेते ठरवतात. त्यांची सत्ता आली ते ठरवतील. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना हटवून महाराष्ट्रातील मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंद आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
आसारामचे चेले असतील
यावेळी त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या फुटप्रिंटच्या विधानाचीही खिल्ली उडवली. चंद्रकात पाटील हे आसाराम किंवा रामरहिमचे चेले असतील. किंवा रामदेव आणि बागेश्वर यांच्याकडून त्यांनी ही कला शिकली असेल, म्हणून त्यांना असे वाटत असेल, असा चिमटा वडेट्टीवार यांनी काढला.
संघाला कुठून फंडिंग येते?
अभिजीत दीपके यांच्या संघटनेला विदेशी फंडिग येते की नाही? याची चौकशी राज्य सरकार करणार आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. आंदोलन करणाऱ्या तरुणाला देशद्रोही म्हणत असाल तर आरएस एसही देशद्रोही आहे. संघाला कुठून फंडिंग होते हे संघाने उघड करावे. संघ नोंदणी करत नाही. जनतेला हिशोब देत नाही. इंग्रजाच्या मागे धावणारी संघटना देशातील तरुणांना देशद्रोही म्हणत असेल तर जनता यांची जागा दाखवेल, असा इशाराच त्यांनी दिला.
हे देवाला घाबरत नाहीत
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपातून भाजप नेते बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते होणारच होतं. महिला खेळाडू आमच्यावर अत्याचार झाल्याचं ओरडून सांगत होत्या. त्यावेळी बृजभूषण सिंहचे गुणगान गात होते. काहीही करा फक्त आमच्यासोबत रहा. तुम्हाला ईडी, कोर्ट सगळीकडून मुक्त करू. बलात्काऱ्यांची मिरवणूक काढतात. हे देवाला मानत नाही असे सांगितलं जात आहे. संघ आणि भाजप देवाला मानत नाही. त्यामुळे यांना देवाची भीती असती तर तो माणूस निर्दोष मुक्त झाला नसता, असंही ते म्हणाले.
