रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाडप्रकरणी रोहिणी खडसेंचा संशय, त्यांचा आका कोण?
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीवर झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणी तीन आरोपींना अटक झाली असतानाही उर्वरित आरोपी फरार आहेत. रोहिणी खडसे यांनी या घटनेवरून राज्य सरकारला खडसावले आहे.

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील संत मुक्ताई यात्रेमध्ये छेड काढल्याचा प्रकार समोर आला होता. या संतापजनक प्रकारामुळे महिला आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याप्रकरणी सात जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र अद्याप उर्वरित आरोपी फरार आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सरकारला चांगलंच खडसावलं आहे.
रोहिणी खडसे यांनी आज जळगावात धुलिवंदन सण साजरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला होळी व धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांना रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. आशिया खंडातील महिलांसाठीच्या सर्वात असुरक्षित देशांपैकी भारत एक आहे, असे एका सर्वेक्षणात म्हटले होते. या यादीत भारताची गणना होणं हे भारतासाठी खूपच दुर्दैवी आहे, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.
त्यांच्यामागे नेमका आका कोण?
“रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याच्या घटनेला आज १० दिवस उलटले आहेत. तरी देखील याप्रकरणी तीन आरोपी अद्याप फरार आहेत. या आरोपींना नेमकं कोणाचं पाठबळ आहे, असा प्रश्न पडला आहे. त्यांच्यामागे नेमका कोण आका आहे ते शोधायला हवं. कोणाचं तरी त्यांना पाठबळ मिळतंय म्हणूनच ते इतके दिवस फरार राहू शकले”, असा आरोप रोहिणी खडसेंनी केला.
“एका केंद्रीय मंत्र्याच्या घरातील मुली सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील सामान्य माताभगिनींच्या सुरक्षिततेबद्दल काय बोलणार? इतकी मोठी घटना होऊनही आरोपी अद्याप फरार आहेत. त्यामुळे माझी मागणी आहे की सरकारने कायद्याचा वचक निर्माण करावा. माझी, तुमची किंवा कोणाचीही मुलगी असली तरी तिला संरक्षण मिळायलाच हवं. ती सरकारची जबाबदारी आहे”, असे रोहिणी खडसेंनी म्हटले.
महिलांच्या संरक्षणासाठी कडक कायदे करणे आवश्यक
“सध्या पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती नाही. त्यामुळेच गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. राज्यात कायद्याचा वचक असता तर गुन्हेगारी घटना घडल्या नसत्या. महिलांच्या सुरक्षिततेबाबत आपलं सरकार निरुत्साही आहे. महिलांच्या सुरक्षेतेकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय असं मला वाटतंय. त्यामुळे महिलांच्या संरक्षणासाठी कडक कायदे करणे आवश्यक आहे. मला असं वाटतं की सरकारने लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे”, असे रोहिणी खडसे म्हणाल्या.