Sangli: सरकारने जलजीवन मिशनच्या कामाचे पैसे थकवले, युवा कंत्राटदाराने संपवलं आयुष्य
सकरारकडून दीड कोटींचे थकीत बिल मिळत नसल्याने 35 वर्षीय हर्षल पाटील या तरुणाने जीवन संपवलं आहे. काम करुनही पैसे न मिळाल्याने हर्षल हे तणावात होते. त्यामुळेच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे.

सांगलीतील एका तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सकरारकडून दीड कोटींचे थकीत बिल मिळत नसल्याने 35 वर्षीय हर्षल पाटील या तरुणाने जीवन संपवलं आहे. हर्षल यांनी राज्य सरकारच्या जल जीवन मिशन योजनेची कामे केली होती, मात्र बिल थकल्याने हर्षल यांनी आपल्या शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हर्षल पाटील हे सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या गावचे रहिवासी आहेत. हर्षल यांनी सावकाराकडून कर्ज घेत जल जीवन मिशन योजनेते काम केले होते. मात्र काम करुनही पैसे न मिळाल्याने हर्षल हे तणावात होते. त्यामुळेच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे.
हर्षल यांच्या आत्नहत्येनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी ट्वीट करत सरकारवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी म्हटले की, ‘आज वाळवा तालुक्यातील तरुण, होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने, सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
आज वाळवा तालुक्यातील तरुण, होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने, सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या… pic.twitter.com/HJewl4yPd2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 23, 2025
सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले. राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसतांना विविध कंत्राटांचे वाटप केले. आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे.
एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात, याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते. या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे. आता या आत्महत्येनंतर तरी सरकारला जाग येणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
