ठाकरे गट काहीतरी मोठं करण्याच्या तयारीत! संजय राऊतांच्या विधानाने खळबळ; खासदार फुटीनंतरचा प्लॅन ठरला!
खासदार फूटण्याची चर्चा केली जात आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. आता नितिमत्ता, पक्षाची शिस्त अशा गोष्टी संपल्या आहेत. आम्ही व्हीप जारी केला आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

Sanjay Raut On UBT MP Revolt : राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे यांच्या पक्षाचे एकूण सहा खासदार फुटले आहेत. या सर्व खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन केल्याचं बोललं जात आहे. लवकरच हा गट एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन होण्याची दाट शक्यता आहे. ही संभाव्य फूट टाळण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत हे दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले आहेत. असे असतानाच त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मोठं विधान केलं आहे. त्यांचे हे विधान समोर आल्यानंतर ठाकरे गट आता काहीतरी मोठी राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याचा अंदाज लावला जात आहे.
विरोधात म्हटल्यावर निधी नाही हे गृहितच धरावे लागते
संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली. यावेळी त्यांनी पक्षाची आगामी भूमिका काय असेल? याबाबत सविस्तर सांगितलं. आम्हाला निधी मिळत नव्हता, म्हणून आम्ही पक्ष सोडत आहोत, असे ते सांगत असतील तर हे चुकीचे आहे. आपण विरोधी पक्षात आहोत, म्हटल्यावर विकासकामांसाठी निधी मिळणार नाही, हे गृहितच धरावे लागते. निधी वगैरे हे सगळे बहाणे आहेत. विकासकामांसाठी निधी मिळत नाही, हे बरोबर आहे. निधीची गरज असते हेही बरोबर आहे. परंतु निधी मिळतच नसेल तर काय करणार. तुम्ही हे स्वीकारले पाहिजे. असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
पण आम्ही त्यांना धडा शिकवणार
तसेच, याआधी आमच्या पक्षात फूट झाली तेव्हा ठीक होते. आता मात्र तुम्ही आमच्या पक्षातून निवडून आले आहात. त्यामुळे बंडखोरांना माफ करता येणार नाही. आता आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या जीवाशी खेळणार नाही. परंतु जे बंडखोरी करत आहेत, त्यांना आम्ही धडा शिकवणार आहोत. अशी रोखठोक भूमिकाही राऊत यांनी सांगितली.
दरम्यान, आमच्या पक्षाने व्हीप जारी केला आहे. त्यामुळे सर्वच खासदारांना उपस्थित राहावे लागणार आहे. असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे कायद्यानुसार पुढे काय कारवाई केली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
