आजीकडून सतत मदतीसाठी हाक, नात वैतागली अन् नंतर जे घडलं… संपूर्ण महाराष्ट्र संतप्त
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील विहाळ येथे आजारी आजीची नातीने भिंतीवर डोके आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात विहाळ गावात एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अर्धांगवायूने (पॅरालिसिस) आजारी असलेल्या ८२ वर्षीय आजीची तिच्याच नातीने क्षुल्लक कारणाने हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरुवातीला हा प्रकार नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न झाला, परंतु पोलिसांच्या कौशल्यामुळे खरा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांतच खुनाचा गुन्हा उघडकीस आणत आरोपी नातीला बेड्या ठोकल्या आहेत. जनाबाई भगवान सुरवसे असे मृत आजीचे नाव आहे, तर मनिषा रविंद्र लवंगारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नातीचे नाव आहे.
नेमके काय घडले?
जनाबाई भगवान सुरवसे या वृद्ध महिला अर्धांगवायू आजाराने त्रस्त होत्या. आजारपणामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्या अंथरुणाला खिळल्या होत्या. आजारपणामुळे होणाऱ्या त्रासामुळे त्या वारंवार तक्रार करत असत. तसेच मदतीसाठी आवाज देत असत. शनिवारी ११ एप्रिलला रात्री ११.३० ते ११.४५ च्या सुमारास याच कारणावरून मनिषा आणि जनाबाई यांच्यात वाद झाला.
आधी मनिषाने आजीला अश्लील शिवीगाळ केली. तू वारंवार किरकिर का करते? असे सांगत तिने त्यानंतर अमानुषपणे लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता तिने आजीचे डोके धरून भिंतीमधील दगडावर जोरात आपटले. डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे जनाबाई यांचा जागीच मृत्यू झाला.
सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद अशी करण्यात आली होती. मात्र, संशय बळावल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, हवालदार अजहर शेख, दीपक घोरपडे आणि किरण पाटील यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. यावेळी शवविच्छेदन अहवालातील निष्कर्ष आणि तपासात मिळालेले पुरावे यात विसंगती आढळून आली. त्यानंतर मग पोलिसांनी आरोपी मनिषा लवंगारे हिची कसून चौकशी केली. पोलिसांच्या उलट तपासणीवर मनिषाचा टिकाव लागला नाही. तिने गुन्ह्याची कबुली दिली.
आरोपीवर कायदेशीर कारवाई
या प्रकरणी हवालदार दिपक हरिश्चंद्र घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मनिषा लवंगारे हिच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम १०३ (१) खून, कलम ११५ (२) स्वेच्छेने दुखापत पोहोचवणे, कलम ३५२ शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान करणे, या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
