आतली बातमी फुटली, महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा हव्या, अखेर आकडा समोर; सुनेत्रा पवार म्हणाल्या…
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाला एकूण किती जागा हव्या आहेत, याबाबत त्यांनी सांगितले आहे.

Vidhan Parishad Election Sunetra Pawar : राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यावेळी एकूण 17 जागांसाठी निवडणूक होणार असून स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधी या निवडणुकीसाठी मतदान करतील. महायुतीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीसाठी जागावाटपावर चर्चा सुरू आहे. कोणाला किती जागा मिळतील, यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांत खलबतं सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी पक्ष जास्त जागा मिळाव्यात या मागणीवर अडून बसलेला आहे. दरम्यान, आता याबाबत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वेसर्वा सुनेत्रा पवार यांनी सविस्तर माहिती दिली आहे. राष्ट्रवादी पक्षाला एकूण किती जागा हव्या आहेत, याबाबत त्यांनी सांगितले आहे.
जिथे आमच्या जागा जास्त आहेत, तिथे..
राज्य मंत्रिमंडळाचे शिष्टमंडळ आज दिल्ली दौऱ्यावर होते. या शिष्टमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली असून कांद्याचा पडलेला भाव याबाबत काहीतरी तोडगा मागावा, अशी मागणी केली. या बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना पत्रकारांनी विधानपरिषदेच्या जागावाटपाविषयी विचारले. यावर बोलताना, जिथे आमच्या जागा जास्त आहेत, तिथे आम्हाला विधानपरिषदेच्या जागा मिळाल्या पाहिजेत अशी आमची भूमिका आहे. आमच्यात सकारात्मक चर्चा चालेली आहे, अशी महत्त्वाची माहिती सुनेत्रा पवार यांनी दिली.
राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा पाहिजेत
तसेच तुम्हाला एक किंवा दोन जागा दिल्या तर चालेल का? असा प्रश्न पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांन विचारला. यावर बोलताना आम्ही एकूण तीन जागा मागितलेल्या आहेत. त्यावर सकारात्मक निर्णय होईल, असे सुनेत्रा पवार यांनी सागितले. दरम्यान, महायुतीत राष्ट्रवादीला जरी 3 जागा हव्या असल्या तरी अन्य दोन पक्ष या पक्षाला फक्त एकच जागा देण्याच्या तयारीत आहेत. भाजपा 12 जागांवर तर शिंदे गट 4 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला फक्त एकच जागा देऊ असे बोलले जात आहे.
