
अहिल्यानगर इथं सोमवारी झालेल्या लाठीचार्जनंतर कोठला परिसरात शांतता आहे. नगर शहरातील कोठला परिसरात पोलीस बंदोबस्त कायम आहे. पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात आहेत. सोमवारी मुस्लिम समाजाच्या रास्ता रोकोनंतर याठिकाणी तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. लाठीचार्जनंतर सात पोलीस जखमी झाले तर 39 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांची सभा होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. अद्याप पोलिसांनी ओवैसी यांच्या सभेला परवानगी दिली नाही. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणी साठी संतप्त झालेल्या धनगर आंदोलकांनी स्वतःची कार पेटवली असल्याची घटना जालन्यातील अंबड तालुक्यातल्या किनगाव चौफुली परिसरात घडली आहे. धनगर आंदोलन दीपक बोराडे हे मागील पंधरा दिवसापासून जालना येथे धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी आंदोलनाला बसले आहेत मात्र सरकारने त्यांच्या मागण्याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे आंदोलकांनी हे पाऊल उचलले.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टी मुळे हैराण झालेल्या बळिराजाच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभी राहणारी व शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असणाऱ्या राज्य सहकारी बँकेने आपल्या नफ्यातून मुख्यमंत्री सहायता निधी साठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मुंबईत आज या मदतनिधीचा चेक सुपूर्द करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीच्या औचित्याने नागपुरात रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात संघाच्या पहिल्या दोन पिढीतील प्रमुख प्रचाराक, विस्तारकांची अनोखी पोट्रेट रांगोळी काढण्यात आली आहे. याद्वारे आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.
पालघरचे शिवसेनेचे आमदार राजेंद्र गावित यांनी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीच्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. आमदारांसोबत महसूल विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते. सरकारने मागील तीन वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई दिली नसल्याच सांगत आमदार गावित यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला.
करूरमधील चेंगराचेंगरीनंतर, अभिनेता विजयचा पक्ष TVK चे करूर पश्चिम जिल्हा सचिव मथियाझगन आणि करूर शहर पदाधिकारी पौन राज यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान दिल्लीत म्हणाले, “आतापर्यंत, आम्हाला 13800 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे आणि ते वाढू शकते, संभाव्यतः 2000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. पंजाब प्रत्येक संकटात देशासोबत उभा राहिला आहे. आता पंजाब संकटाचा सामना करत आहे, तेव्हा देशानेही पंजाबसोबत उभे राहिले पाहिजे.”
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बिकानेरमधील लडाख निदर्शनांवर प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेसच्या एका नगरसेवकाने लेहच्या लोकांना हिंसाचारासाठी भडकावले”, असं मेघवाल यांनी म्हटलं.
जवळपास 60 लाख हेक्टर जमिनीचे पीक नुकसान झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.
ठाण्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडली आहे. ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय पदाधिकारी कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रम खामकर,जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रफुल कांबळे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
माढा तालुक्यातील सीना नदी काठच्या ऊसाच्या शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. सीना नदी काठचा भाग हा ग्रिन बिल्ट म्हणून ओळखला जातो. हा ग्रिन बेल्ट पुरामुळे पुरता भुईसपाट झाला आहे. पुरामुळे हजारो हेक्टरवरील ऊसाचे पिक आडवे झालं आहे. लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून भरघोस मदतीची अपेक्षा आहे.
कल्याण पश्चिमेकडील बिर्ला कॉलेज परिसरात आज दुपारच्या सुमारास विजेच्या धक्क्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संदीप चौधरी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. संदीप चौधरी हे केडीएमसीच्या खाजगी कंत्राटदाराचा कर्मचारी होते.
पथदिव्यांची दुरुस्ती करत असताना संदीप चौधरी याचा महावितरणच्या हाय टेन्शन वायरला स्पर्श झाला. त्यामुळे संदीप यांना जोरदार विजेचा झटका बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळेपथदिवे आणि विविध विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या खाजगी कर्मचाऱ्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कुर्ल्यात पोलिसांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना अडवलं आहे. कुर्ल्यात रिक्षावर आय लव्ह मोहम्मद या आशयाचे पोस्टर लावण्यात आले. त्यानंतर सोमय्या कुर्ल्यात पोहचले. मात्र कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून पोलिसांनी सोमय्या यांना अडवलं आहे. यावरुन सोमय्या यांनी हे पोस्टर लावणाऱ्यांना अटक का केली नाही? ही दादागिरी चालणार नाही, असं म्हणत संताप व्यक्त केला.
अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजासाठी मोठ्या प्रमाणात मदत दिली जात आहे. त्यानंतर आता साईबाबा संस्थानने मोठा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने मदत वाढवून देण्याचा निर्य घेतला आहे. प्रशासनाने मदतीच्या रक्कमेचा आकडा वाढवला आहे. 1 ऐवजी 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव न्यायालयाकडे पाठवण्यात आला आहे. संकटाची तीव्रता आणि गांभीर्य ओळखून रकमेत वाढ करण्याचा साई संस्थानने निर्णय घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर : आज मनोज जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड, फुलंब्री आणि कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. तसेच यावेळी मनोज जरांगे यांनी कन्नडमधील चिंचोली येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेताची पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
बीडच्या श्री क्षेत्र नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या 2 ऑक्टोबरला दसरा मेळावा होणार आहे.
यासंदर्भात साक्षाळपिंप्री येथे बॅनरबाजी करण्यात आलेली असून बॅनरवर मनोज जरांगे पाटील यांचा OBC प्रवर्गाचे प्रमुख नेते म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
ठिकठिकाणीच्या बॅनरवर OBC प्रमुख असा मजकूर लिहून होर्डिंग्ज तयार केले आहेत. या बॅनरची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
सोलापूर जिल्हातील ४५२१ नागरिकांना पुराच्या पाण्यातुन सुखरुपपणे बाहेर काढले आहे. ८८ गावे पुरामुळे बाधीत झाली होती. यात सुदैवाने कोणाचाही पाण्यात अडकल्यामुळे मृत्यु झालेला नाही.१७ टिमद्वारे ही मोहिम राबविली होती. आता बचाव कार्य संपले आहे.
नालासोपारा पूर्वेकडील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.दोन दुकाने या आगीच्या विळख्यात सापडल्याने मोठ्या प्रमाणावर दुकानांचे आर्थिक नुकसान झाले आहे.सुदैवाने यात कोणतीही जखमी झाले नाही.
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असलेल्या शेवटचं गाव म्हणजे आपेगाव. जायकवाडी धरणातून गोदावरी नदी पात्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने गोदावरी नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
नाशिक येथील बाल सुधारगृहातून पलायन केलेल्या मुलाने फिरस्ती इसमाची हत्या केल्याची पोलीस तपासत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
मेहकर तालुक्यातील भोसा या गावातील सरपंच यांनी केलेल्या अतिक्रमनाविरोधात् तसेच इतर भ्रष्टाचार संदर्भात तक्रार देऊन ही कारवाई न केल्याने दोन ग्रामस्थ पेट्रोल ची बाटली घेऊन जिल्हापरिषदचे सभागृहाच्या टॉवरवर चढले आहेत.
जळगावमधील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, तालुक्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भडगाव तालुक्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आहेत.
ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा.नांदेडच्या देगलूरमध्ये काँग्रेसने काढला ट्रॅक्टर मोर्चा. बैलगाडीत भरून आणलं नुकसान झालेलं शेती पीक.
“दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात पाऊस थांबलेला आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय सैन्य बलाची तुकडी आम्ही बोलवून घेतलेली आहे. सुदैवाने जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे आणि पावसाने ही उघडीप घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याची आवक कमी झाली आहे. परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत. प्रशासनाकडून पूरग्रस्त भागातील नागरिकांना धान्य सहित गरजेच्या वस्तू वाटप करणे सुरू आहे” असं जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले.
आज संध्याकाळी सहा वाजता इंग्लंड येथून Worlds Best School स्पर्धेचा अंतिम निकाल थेट प्रसारित केला जाणार.
जगातील टॉप टेन शाळांमध्ये निवड झाल्यानंतर पुण्याच्या खेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा जालिंदरनगर ही शाळा या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली होती. पुण्याच्या खेड तालुक्यातील जालिंदर नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जागतिक सर्वोत्तम शाळा पुरस्कारासाठी भारतातुन लाखो शाळांमधून निवड होणारी ही एकमेव शाळा आहे.
डोंबिवलीतील खंबाळ पाडा परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. सापाच्या चाव्याने चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. त्यानंतर आज उपचार घेत असलेल्या बालिकेच्या मावशीचाही मृत्यू झाला. शास्त्रीनगर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे.
जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये तब्बल पंधराशे रुपयांची,तर चांदीच्या दरात सुद्धा पंधराशे रुपयांची वाढ झाली आहे
शाळेत जायला बस नसल्याने विद्यार्थ्यांचा बस समोर रास्ता रोको आंदोलन केले. आक्रमक झालेल्या चिमुकल्याने मुखेड तालुक्यातील खैरकावाडी गावाजवळ बस थांबवली. हाळदा ते मुखेड बस सेवा सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.
सातपुडा पर्वतरांगे मुसळधार पाऊस झाल्याने वडोदा वन भागातील वन्य प्राण्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा चारठाणा येथील तलाव हा यावर्षी अखेर शंभर टक्के भरले आहे.त्यामुळे शेतीचा सिंचनाचा प्रश्न या ठिकाणी मिटला आहे आणि वडोदा वनक्षेत्र हे 12हजार 530 हेक्टर एवढे क्षेत्रातील वन्य प्राण्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे मोठा दिलासा या ठिकाणी मानला जात आहे.
एआयएमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या जाहीर सभेच आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ वाजता अहिल्यानगर शहरातील मुकुंद नगर परिसरातील सी आय व्ही मैदानावर सभा पार पडणार आहे. महापालिकेच्या पार्श्वभूमीवर सभेच आयोजन मात्र काल झालेल्या लाठीचार्ज नंतर सभेला महत्त्व आले आहे.
धाराशिवमधील कळंब तालुक्यातील संजीतपूर येथील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटीसा देण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. एकीकडे अतिवृष्टीने शेतकरी बरबाद झालाय तर कर्ज भरण्यासाठी बँकेने तगादा लावलाय
जालना जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कपाशी सोयाबीन यासह फळबागांना याचा मोठा तडाखा बसलाय.अंबड तालुक्यातील लोणार भायगाव,कर्जत,हस्तपोखरी,खेडगाव चिकणगाव यासह आसपासच्या परिसरात दोन दिवसांपूर्वी कमी अधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाची बोंडे सडण्यास आता सुरुवात झाली असल्याने शेतकरी चिंतेमध्ये आहे.एकीकडे शेतात साचलेल्या पाण्याचा कुठेतरी निचरा होत असताना दुसरीकडे मात्र ही बोंडे सडत असल्याने शेतकऱ्यांना कापूस उत्पादनात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी नाकाने कांदे सोलणे बंद करावे. त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी दौरा केला पण मदत केली नाही. संजय राऊत तुम्ही फसवी मदत केली. चिपळूण मध्ये दौरा केला पण मदत मिळाली नाही अशी टीका नवनाथ बन यांनी केली.
निकष न पाळता मदत करण्याचे देवा भाऊने आधीच सांगितलं आहे. विशेष अधिवेशनची मागणी केली. पण त्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च होत आहेत
शेतकऱ्यांना दिवाळी पूर्वी ही आनंदाची बातमी मिळेल. सरकारच्या वतीने मदत केली जात आहे असे ते म्हणाले.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासाने सध्या 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ यासह 3 किलो तूरडाळ देण्याचे आदेश दिले आहेत. अन्नधान्य वाटपाचे काम सुर झाले आहे. काही भागात तूरडाळ अद्याप पोहचलेली नाही. तर या कीटमध्ये तेल, मीठ, साखर, चहा आणि स्वयंपाकाची भांडी देण्याचं आश्वासन देण्यात आले असताना या वस्तू मात्र कीटमधून गायब झाल्या आहेत.
कोल्हापूर – कोयत्याने वार करून पतीने त्याच्या पत्नीची हत्या केली. पळून गेलेल्या पतीला पोलिसांनी रात्री उशीरा अटक केली आहे.
आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रीमंडळाची बैठक, अतिवृष्टीतील नुकसानभरपाई बाबत होणार चर्चा. किती नुकसान झालं याबद्दल पालकमंत्री बैठकीत माहिती देणार आहेत.
अंधेरी पूर्वेतील पी एंड टी कॉलनीमध्ये वन प्लस वनचे घर कोसळलं. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, ही एक जुनी, जीर्ण इमारत आहे. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
नांदगाव – आमदार सुहास अण्णा कांदे यांचा अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा, मका, सोयाबीन, कापूस यासह अनेक पिकांचे मोठे नुकसान. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत धीर दिला आणि “सरकार व मी तुमच्या पाठीशी आहोत” असल्याचे आश्वासनही दिले.
नुकसानभरपाई व पीक विम्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन देण्यात आले. तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश. साकोरा, तळवाडे, वेहेळगाव, आमोदे, बोराडे, जामदरी, न्यायडोंगरीसह अनेक गावांची पाहणी केली.
प्रेम प्रकरणातून तरुणी त्याला इग्नोर करत होती आणि तरुणी त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेली म्हणून तरुण थेट चढला सहाव्या मजव्यावर आत्महत्या करण्यासाठी. तरुणी त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेली असता व्हिडीओ कॉल करून तरुणीला स्वतः दिली होती माहिती. अमरावतीच्या गाडगे नगर पोलिसांनी उडी मारणाऱ्या तरुणाला पकडलं. दोन तासानंतर समजूत काढून युवकाला पोलिसांनी वाचवलं
अंदाजे 73 हजार रुपये किमतीचे 29 ग्रॅम एम डी ड्रॅग्स सोलापूर शहर पोलिसांनी केले जप्त. याप्रकरणी अमीर दिना या 30 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केलीय
आज दुपारी बारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील दुष्काळ आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवर या मंत्रिमंडळ बैठक चर्चा होण्याची शक्यता आहे.
नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर शिवारात पाणी. तब्बल 2700 एकर सोयाबीन पाण्याखाली शेतकऱ्यांचे मोठं नुकसान
गोंदियाच्या कोहमारा-वडसा मार्गावरील घटना. अर्जुनी मोरगव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..
नाशिक- गोदा घाट परिसरातील पूर ओसरला असून रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं अजूनही पाण्याखालीच आहेत. दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आलंय. पावसाने विश्रांती घेतल्याने पूर ओसरला आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होण्याची शक्यता आहे.
अहिल्यानगर इथं सोमवारी झालेल्या लाठीचार्जनंतर कोठला परिसरात शांतता आहे. नगर शहरातील कोठला परिसरात पोलीस बंदोबस्त कायम आहे. पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
राज्याकडून विविध कामांसाठी थेट १६५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आल्याने ठाणे पालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाकाळापासून बिघडलेले जमा-खर्चाचे गणित आणि वाढलेल्या दायित्वामुळे आर्थिक संकटात असलेल्या ठाणे पालिकेसाठी राज्याचा मोठा आधार मिळाला आहे. विविध नागरी विकासकामांसाठी ठाणे महापालिकेला राज्य शासनाकडून आणखी १६५ कोटी रुपयांचा निधी जाहीर करण्यात आला. हा निधी रंगरंगोटी, रस्ते दुरुस्ती, सार्वजनिक शौचालये, नाट्यगृह दुरुस्ती, रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांसारख्या महत्त्वाच्या कामांसाठी वापरला जाणार आहे.
धुळे जिल्ह्यातल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मका, सोयाबीन, कापूस ही पिकं पाण्यात गेली आहेत. शेतामध्ये गुडघाभर पाणी असताना महसूल खात्यातर्फे पंचनामे करण्यास नकार देण्यात आला. 65 मिलिमीटर पाऊस झाला नसल्याने आम्ही पंचनामा करू शकत नाही असं उत्तर महसूल खात्याने दिलं.
गिरणा नदीने रौद्ररूप धारण केलं आहे. गिरणा नदीला मोठा पूर आल्याने नदी आपले पात्र सोडून वाहत असून धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील हजारो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली गेली आहे. गिरणा नदीच्या पुराच्या पाण्यात सातत्याने वाढ होत असल्याने नदीने आपल्या प्रवाहाची दिशा बदलल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. गिरणा नदीच्या पुराचे पाणी धरणगाव तालुक्यातील चांदसर गावात शेतांमध्ये शिरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जळगावात ममुराबाद रोड परिसरात माजी महापौर यांच्या फार्म हाऊस येथील इमारतीतील सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी अटकेतील शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्या सह 7 जणांना जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांना वेगवेगळ्या बहाण्यांनी संपर्क साधून त्यांची ऑनलाइन फसवणूक केली जात होती
नाशिक- खुनातील आरोपींनी कारागृहातून सुटल्यानंतर मिरवणूक काढली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नाशिकरोड पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलं आहे. अंबड पोलिस ठाण्यातील खुनाचा आरोपी महेश सोनवणे उर्फ चिमण्या सुटल्यावर मिरवणूक काढण्यात आली होती. यात 15-20 जणांचा सहभाग होता.