मोठी बातमी! एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? राज्यात घडामोडींना वेग, बड्या नेत्यानं सगळंच सांगितलं
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी आपल्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. 9 पैकी 4 खासदारच प्रत्यक्षात या बैठकीला उपस्थित होते. तर इतर 5 खासदार हे बैठकीला ऑनलाईन उपस्थित असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला होता. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाच्या गोटात हालचालींना वेग आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. तसेच ते लोकसभा अध्यक्षांना त्या संदर्भात पत्र देखील देणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. एवढंच नाही तर शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी दिल्लीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची देखील भेट घेतली आहे. त्यामुळे आता लवकर हे खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत देखील तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत.
हे सर्व खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान जर या पाच खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला तर शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढणार आहेत. तसेच अलिकडच्या काळात एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या देखील वाढल्या आहेत. त्यामुळे या पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात पत्रकारांनी मुनगटींवार यांना प्रश्न विचारला होता.
‘पाच खासदार आल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय का? ते देखील कधी अपेक्षा करत नाहीत. मला जी माहिती आहे, त्यानुसार जेव्हा विधानसभेची निवडणूक झाली होती तेव्हाच त्यांनी वर्तमान पत्रात जाहीरपणे सांगतिलं होतं की मी काही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार नाही. मग हा प्रश्न कुठे उद्भवतो? असा प्रश्न यावेळी मुनगंटीवरा यांनी उपस्थित केला आहे. पाच खासदार आले की, ते मुख्यमंत्री होतील असं काही नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, आणि तेच राहणार आहेत,’ असं यावेळी मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे, त्यामुळे आता या चर्चेला पूर्वविराम मिळाला आहे. दरम्यान राज्यात ऑपरेशन टायगर होणार का? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला मात्र त्यांनी सावध उत्तर दिल्याचं पहायला मिळालं. त्याबद्दल आपल्याला माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
