भारतावर सुपर एल निनोचे महाभयंकर संकट, दुष्काळाचा गंभीर इशारा; पुढचे दिवस कठीण!
भारतावर सुपर एल निनोचे संकट येऊ शकते. हे संकट जर आले तर भारताला दुष्काळाला तंड द्यावे लागेल. तसेच पाऊसही कमी होऊ शकतो. म्हणूनच प्रशासनाला योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.

Weather Update : हवामान तज्ज्ञ आणि संशोधकांनी एक गंभीर इशारा दिला आहे. भारतात या वर्षी सुपर एल निनोचे संकट येण्याची शक्यता आहे. हे संकट खरंच आले तर आपल्याकडे उष्णता वाढू शकते. तसेच पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडण्याची भीती आहे. त्यामुळे दुष्काळासारखे महाभयंकर संकट भारतावर येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याआधी 2015-16 साली असेच संकट आले होते. तेव्हा भारतात अनेक ठिकाणी दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली होती.
सुपर एल निनोचे संकट नेमके काय आहे?
सुपर एल निनोमुळे पृथ्वीच्या वातावरणीय चक्रात मोठे बदल होतात. प्रशांत महासागरात पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान खूप वाढते. हे तापमान 2 अंश सेल्सिअस जरी वाढले तरी त्याचा संपूर्ण देशावर गंभीर परिणाम होतो. भारतात याआधी 2015-16 साली सुपर एल निनोचे संकट आले होते. त्या वर्षी खूप कमी पाऊस पडला होता. परिणामी जलस्त्रोतांवर खूप दबाव आला होता. अनेक राज्यांत शेतीवरही मोठे संकट आले होते. त्याआधी 1997-98 साली असेच संकट आले होते. 1877-78 सालाच्या सुपर एल निनोमुळे तर भारतात महादुष्काळ आला होता. त्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला होता.
परिणाम मात्र गंभीर
या वर्षी म्हणजेच 2026 साली जुलै महिन्याच्या मध्यात सुपर एल निनोसारखी स्थिती होण्याची शक्यता 61 ते 80 टक्के आहे. पाऊस सरासरीच्या 92 टक्के होण्याची शक्यता आहे. हा आकडा लहान वाटत असला तरीही त्याचा परिणाम मात्र गंभीर आणि मोठा असू शकतो. सुपर एल निनोमुळे फक्त गरमीच नव्हे तर पावसावरही परिणाम होतो. सुपर एल निनोमुळे शेतीचे उत्पादन कमी होते. तसेच गंभीर स्थिती झाल्यास दुष्काळही येऊ शकतो.
दरम्यान, हे संकट लक्षात घेता आता प्रशासन आणि सरकारला अगोदरपासूनच योग्य ते पाऊल उचलावे लागणार आहे. लोकांना पाणी तसेच अन्य महत्त्वाच्या गोष्टींची कमतरता भासू नये हे पाहावे लागणार आहे.
