शस्त्रसंधी झाली पण अजूनही खेळ संपलेला नाही, 12 मे रोजी घडणार मोठी घडामोड; नेमकं काय होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता निवळण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देशांत शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचं म्हटलं जात आहे.

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आता निवळण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही देशांत शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे भारताने अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. भारत आणि पाकिस्तानने चर्चा करून हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी अजूनही या दोन्ही देशांतील तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. कारण 12 मे रोजी आणखी एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे.
12 मे रोजी नेमकं काय होणार?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध छेडलं जाऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे दोन्ही देशांचे लष्कर आणीबाणीच्या काळाला तोंड देण्यासाठी सज्ज होते. पाकिस्तानकडून भारतावर हल्ले केले जात होते. भारतही या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत होता. असे असताना आता या दोन्ही देशांनी पुढे येत शस्त्रसंधीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला करण्याचे थांबवले आहे. 5 वाजेपासून या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती
भारताने शस्त्रसंधीची अधिकृत घोषणा करण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करण्याचे मान्य केले आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. त्यानंतर भारतानेही शस्त्रसंधी झाल्याचं अधिकृतपणे सांगितलं होतं.
12 मे रोजी नेमकं काय होणार?
मिळालेल्या माहितीनुसार भारताच्या डीजीएमओंना पाकिस्तानच्या डिजीएमओंचा कॉल आला होता. दुपारी झालेल्या या कॉलमध्ये दोन्ही डिजीओंमध्ये युद्धजन्य स्थिती थांबवण्यावर चर्चा झाली होती. त्यानंतर 5 वाजेपासून दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. दोन्ही देशांत सध्या शस्त्रसंधी झालेली असली तरी अद्याप हा तणाव पूर्णपणे संपलेला नाही. याच कारणामुळे येत्या 12 मे रोजी दोन्ही देशांच्या डिजीओंमध्ये चर्चा होणार आहे. या चर्चेत शस्त्रसंधीच्या अटी आणि इतर गोष्टींवर चर्चा होणार आहे. त्यामुळे 12 मे रोजी होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ही चर्चा सकारात्मक ठरली तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध टळू शकते अन्यथा भविष्यात काहीही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.