नीट पेपरफुटीवर पंतप्रधानांचा मोठा निर्णय, प्रियंका गांधी यांचं थेट उत्तर, सोल्यूशन काढायचंच असेल तर…
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप असून, पंतप्रधान मोदींनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची घोषणा केली आहे. यावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी प्रतिक्रिया देत, सिस्टिमच्या बाहेर जाऊन तोडगा काढण्याचे आवाहन केले.

गेल्या चार दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर केंद्र सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चेची तयारी दाखवली आहे. पण केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नीट पेपरफुटी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. मोदी यांनी ही घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला तोडगाच काढायचा असेल तर सिस्टिमच्या बाहेर जाऊन काढला पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रियंका गांधी यांनी व्यक्त केली आहे.
प्रियंका गांधी संसदेच्या आवारात आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. तुम्ही नेता आहात. नेतृत्व दाखवण्याची वेळ आली आहे. मुलं काही सांगत आहेत. त्यांचं ऐका. मुलांची स्पष्ट मागणी आहे. प्रधान यांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांवर मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा. तरुणांचा सिस्टिमवरचा विश्वास उडाला आहे. सिस्टिमद्वारा सोल्यूशन दिलं तर मुलं विश्वास ठेवणार नाही, ही साधी गोष्ट आहे, असं प्रियंका गांधी म्हणाल्या.
नेत्यांनी भय दूर करून
पंतप्रधान आणि मंत्र्यांनी विद्यार्थ्यांचं ऐकलं पाहिजे. तोडगा काढायचा असेल तर मुलांचं ऐका. त्यांच्या मागण्या मान्य करा. तरच तोडगा निघेल. विद्यार्थ्यांचा सिस्टिमवर भरवसा नाही, तरी म्हणता हीच सिस्टिम चौकशी करेल. कधी कधी नेत्यांना भय दूर करून जनतेचं ऐकावं लागेल. आज ही वेळ आली. हजारो मुलं रस्त्यावर आहे. हजारो मुलं इंडिया गेटवर आहेत. जंतरमंतरवर आहेत. अनेक ठिकाणी आहेत, असं प्रियंका यांनी सांगितलं.
लाठ्या का चालवता?
जेव्हा सिस्टिमवरचा विश्वास उडतो, तेव्हा विश्वास कायम ठेवायचा असेल तर काही पावलं उचलावी लागेल. मंत्र्यांचा राजीनामा घ्याय मुलांची काळजी आहे म्हणता, तर त्यांना मारता का? लाठ्या का चालवता? अश्रूधुराच्या नळकांड्या का फोडता? असा संतप्त सवाल करतानाच यावर तोडगा काढायचा असेल तर सिस्टिमच्या बाहेर जाऊन करावा लागेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संसदेबाहेर विरोधक आक्रमक
दरम्यान, आज संसदेबाहेर विरोधकांनी जोरदार निदर्शने केली. हातात फलकं घेऊन विरोधक संसदेबाहेर जमले होते. यावेळी विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा केल्या. विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी लावून धरली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही विरोधकांनी केली. त्यानंतर विरोधकांनी लोकसभेत जोरदार घोषणाबाजी करत हंगामा केला. त्यामुळे लोकसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.
