लासलगाव : ऊस गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात ऊस साखर कारखान्यावर जाण्याऐवजी फडातच त्याची राखरांगोळी होण्याच्या घटना वाढत आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना शेतकरी वाढीव उत्पादनाचे स्वप्न पाहत आहे. मात्र, एका रात्रीतून शेतकऱ्यांच्या या स्वप्नांचा चुराडा होत आहे. कारण शार्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही निघत नाही अशी अवस्था आहे. सिन्नर तालुक्यातील वल्हेवाडी शिवारातील निवृत्ती यादव यांचा अडीच एकरातील ऊस याच कारणामुळे जळाला आहे. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
पुढील आठवड्यात होती तोडणी: वर्षभर निवृत्ती यादव यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊसाची जोपासणा केली होती. त्यामुळे किती टन ऊस होईल याची गणितेही यादव हे मांडत होते. पण एका ठिणगीमुळे क्षणार्धात त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.
1 / 5
ऊसावरच होते सर्वकाही अवलंबून: निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय रब्बी हंगामावर बदलत्या वातावरणाचा धोका आहेच. त्यामुळे ऊसातूनच उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास यादव यांना होता. मात्र, तोड काही दिवसांवर आली असतानाच ही दुर्घटना घडली आहे.
2 / 5
अडीच एकरातील ऊसाचे नुकसान: निवृत्ती यादव यांनी अडीच एकरामध्ये ऊसाची लागवड केली होती. इतर पिकांचे तर नुकसान झाले पण ऊसातून निश्चित उत्पन्न मिळणार म्हणून त्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याची जोपासना केली होती. अखेर आगीमुळे अडीच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.
3 / 5
नुकसान भरपाईची मागणी: महावितरणच्या गलथान कारभारामुळे केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाला आग लागण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होतेच पण वेळेत महावितरणकडून आर्थिक मदतही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही महावितरण कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत.
4 / 5
शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे: यंदा निसर्गाचा लहरीपणा कायम राहिलेला आहे. याचा केवळ ऊसावर परिणाम झालेला नव्हता पण अशा दुर्घटनांमुळे ऊसाचीही सुटका झालेली नाही. त्यामुळे संबंधित साखर कारखान्यानेही आहे त्या ऊसाचे गाळप करुन शेतकऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.