महायुतीत धुसफूस, चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांची नाराजी, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अजित पवार यांनी महायुतीच्या समन्वयकांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
देशात आणि राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगलेली बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात तर मतदानाचे तीन टप्पे देखील पार पडले आहेत. आता फक्त दोन टप्पे शिल्लक राहिलेले आहेत. उरलेल्या दोन टप्प्यांसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत राज्यात बघायला मिळत आहेत. महायुतीच्या उमेदवारांकडून महाविकास आघाडीवर निशाणा साधला जातोय. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या दोन्ही बाजूने सुरु असतानाच महायुतीमधील धुसफूसीची एक बातमी समोर आली आहे. भाजपचे बडे नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आम्हाला फक्त शरद पवार यांचा पराभव करायचा आहे. बाकी काही नको, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी बारामतीत केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते?
“शेवटी राजकारणात एक तराजू लावायचा असतो. काय वजनदार आहे, काय हलकं आहे, आम्हाला शरद पवार यांचा पराभव जास्त महत्त्वाचा आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्याला शरद पवार यांचा पराभव हवा आहे. बाकी काही नको”, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावर अजित पवार नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
महायुतीच्या समन्वयक बैठकीत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. “हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते”, अशी खंत अजित पवारांनी महायुतीच्या समन्वय बैठकीत बोलून दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.