एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात उद्धव ठाकरेंना फटकारलं, म्हणाले, त्यांची ती सवयच…
Shivsena : सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आहे. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले आहे. वांगचूक यांच्या या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आहे. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिंदे यांनी म्हटले की, ‘आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल, त्यांचा नेहमीच सर्वांना बाहेरून पाठिंबा असतो, घरातून पाठिंबा असतो. तुम लढो हम कपडा संभालते है, अशी त्यांची सवय आहे. एक म्हण आहे, बुडाला जळतय आणि डोंगरावर आग विझवण्यासाठी पळत आहे अशी उबाठाची अशी अवस्था झाली आहे. सोनम वांगचूक यांचं जे आंदोलन आहे, जेव्हा जेव्हा असे सरकारविरोधात आंदोलन असते, त्यांना यांचा पाठिंबा असतो. श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरले होते अशी मुद्दाम उबाठाचे लोक नेहमी आठवण करून देत आहेत.’
राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न
पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ‘उबाठाच्या लोकांना आता वाटत आहे की, हे जे देशव्यापी विद्यार्थ्यांच आंदोलन सुरू आहे, त्यात आपली पोळी कशी भाजून घेता येईल, अशाप्रकारचे खालच्या थराच राजकारण करण्याचा हेतू त्यांचा आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये अराजकता कशी पसरेल, कायदा सुव्यवस्था कशी पसरेल आणि लोक रस्त्यावर येऊन आंदोलने कशी करतील अशा भ्रमामध्ये ही सगळी मंडळी आहे. खरं म्हणजे बांग्लादेश, नेपाळमध्ये अर्थव्यवस्था कोलमडलेली होती, लोकांचे खायचे हाल होते, मात्र आपला देश मोदींजींच्या नेतृत्वात प्रगती करत आहे, अनेकांना मोफत धान्य दिले जात आहे. 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचे काम या सरकारने केले आहे. हा त्या देशांमध्ये आणि आपल्या देशात फरक आहे.’
युवा वर्ग मोदींच्या बाजूने…
एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले की, ‘2014 पूर्वी झालेले घोटाळे युवा वर्गाने पाहिलेले आहेत, त्यामुळे युवक आजपर्यंत मोदींसोबत आहे. या काळात झालेली देशाची प्रगती तो पाहत आहे. युवकांना काम मिळत आहे, युवक मोदींच्या सोबत आहे. त्यामुळे यांच्या मनात जे आहे, देशात अराजकता पसरली पाहिजे, देशात कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे, यासाठी हे लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. परंतू त्यांच्या प्रयत्नांना यश कधीच येणार नाही. कारण या देशाला आणि राज्याला एक संस्कृती आहे, हा एक केविलवाणा प्रयत्न आहेत.
बाळासाहेबांचे विचार सुटले तेव्हाच…
पुढे एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘आधी हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले, आता रामरक्षा आंदोलन करत आहेत. आता त्यांना कळलं आहे, जो राम का नही, म्हणून रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. मी एवढंच सांगतो की, त्यांनी कितीही हिंदुत्वाचा आव आणला तरी त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच हिंदुत्व सुटलेलं आहे.’
