ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज?

| Updated on: Jan 15, 2021 | 8:11 PM

राज्यातील 34 जिल्ह्यांमधील तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या या सोबतच सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. (gram panchayat election 2020)

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज?
Follow us on

मुंबई : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी बुधवारपासून (23 डिसेंबर) उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. राज्यातील 34 जिल्ह्यांमधील तब्बल 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. मतदान झाल्यानंतर 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात एकही अर्ज नाही

वेगळवेगळ्या जिल्ह्यात निवडणूक अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या दिवशी अर्ज भरण्यासाठी म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळालेला नाही. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 767 ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात पहिल्या दिवशी निवडणूक लढवण्यासाठी फक्त 6 उमेदवारांनी अर्ज भरला आहे. अहमदनगर तालुक्यातून 3 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर श्रीरामपूर, नेवासा, श्रीगोंदा या तालुक्यांतून प्रत्येकी एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 629 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली असली तरी या जिल्ह्यात एकही उमेदवाराने आपला अर्ज भरलेला नाही.

हिंगोलीमध्ये वेबसाईट सुरु व्हायला उशीर

हिंगोली जिल्ह्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा पहिला दिवस होता. याही जिल्ह्यात एकही उमेदवार आपला अर्ज भरण्यास समोर आलेला नाही. अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन वेबसाईटद्वारे सोय करुन देण्यात आली आहे. ही वेबसाईट सकाळी सुरु होणे अपेक्षित होते. मात्र, वेबसाईट सुरु व्हायला दुपारचे 12 वाजले.

यामुळे काही प्रमाणात गोंधळ निर्माण झाला होता. त्यात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बँकेत केलेल्या ताच्या व्यवहारांची माहिती असणे बंधनकारक असल्याचा नियम उमेदवारांना ऐनवेळी समजला. या सर्व प्रकारामुळे उमेदवार गोंधळात पडल्याचा आरोप करण्यात येतोय. तर परभणी जिल्ह्यात एकूण 566 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. जिल्ह्यात फक्त एकाच उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, 2020-21 च्या निवडणुकीत दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे सरपंच-उपसरपंच पदाचे आरक्षण निकालानंतर जाहीर होणार आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी, भाजप, मनसे या सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे. त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार आहेत.

संबंधित बातम्या :

पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश राजकीय हेतूने, विकासासाठी किती पैसे देणारे ते सांगा : चंद्रकांत पाटील

मोठी बातमी: पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेला परवानगी नाकारली

‘EWS आरक्षण म्हणजे मराठा आरक्षण खटल्याचा खून’

(gram panchayat election 2020 candidates form filling update)