काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप, लोकसभेच्या उमेदवाराचा ऐनवेळी अर्ज मागे, थेट भाजपात प्रवेश
काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यानंतर तिथे भाजप उमेदवाराची बिनविरोध खासदार म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता इंदौरमध्ये भाजपने खूप मोठी राजकीय खेळी खेळली आहे. या खेळीमुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात पडद्यामागे जोरदार घडामोडी घडताना दिसत आहेत. प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार जिंकून यावा, यासाठी प्रयत्न करत आहे. काही दिवसांपूर्वी सुरतमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला होता. कारण काँग्रेस उमेदवाराचा अर्ज काही कारणास्ताव बाद झाला होता. त्यानंतर भाजप सोडून इतर सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याची चर्चा होती. यानंतर आता मध्यप्रदेशात भाजपने मोठी राजकीय खेळी खेळली आहे. भाजपने इंदौरमध्ये थेट काँग्रेसच्या उमेदवाराकडे आपल्याकडे वळवलं आहे. या उमेदवाराने स्वत:चा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच त्याचा भाजपात प्रवेश करुन घेतला आहे. त्यामुळे इंदौरमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. कारण इंदौरचे काँग्रेस उमेदवार अक्षय बाम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर ते भाजपात सहभागी झाले आहेत. अक्षय बाम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता इंदौर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस निवडणुकीच्या रणांगणात नाहीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षय भाजप आमदार रमेश मेंदोला यांच्यासोबत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी गेले होते.
कैलाश विजयवर्गीय यांचं ट्विट
इंदौर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान खासदार शंकर लालवावानी यांना तिकीट देण्यात आलं आहे. अक्षय बाम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करत महत्त्वाची घोषणा केली आहे. इंदौरचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बाम यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री मोहन यादव आणि प्रदेशाध्यक्ष वीडी शर्मा यांच्या नेतृत्वातील भाजपात स्वागत आहे, असं कैलाश विजयवर्गीय म्हणाले आहेत.
काँग्रेसकडून संताप व्यक्त
अक्षय बाम यांनी उमेदलारी अर्ज मागे घेतल्यानंतर इंदौर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आला आहे. काँग्रेसचे नेते मुकेश नायक यांनी अक्षय बाम यांच्या या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. हा पक्षाला खूप मोठा धोका आहे. भाजपने निर्लज्जपणाच्या सर्व सीमा पार केल्या आहेत, अशी टीका मुकेश नायक यांनी केली आहे.
पाच दिवसांपूर्वीच दाखल केलेला अर्ज
अक्षय बम यांनी पाच दिवसांपूर्वी म्हणजेच 24 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. इंदौर, उज्जैन, धार यांसह आठ लोकसभा मतदारसंधघामध्ये 13 मे ला चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघात असाच काहीसा प्रकार बघायला मिळाला होता. काँग्रेस उमेदवार निलेश कुम्भानी यांचं नामांकन रद्द करण्यात आलं होतं. त्यांच्या हस्ताक्षरात काहीतरी गडबड आढळली होती. त्यामुळे रिटर्निंग ऑफिसरने एक दिवसआधीच त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द केला होता. त्यानंतर त्या जागेवर जितके उमेदवार होते त्या सर्वांनी आपले अर्ज मागे घेतले होते. यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांना बिनविरोध विजयी घोषित करण्यात आलं.