विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा अजूनही कायमच? आता एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये, महायुतीच्या गोटातून मोठी बातमी
मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यानंतर आता यामध्ये आणखी एक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलं आहे. जागा वाटपाच्या फॉर्मुल्यानुसार भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 11 तर शिवसेना शिंदे गटाला 4 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन जागा मिळणार आहेत. मात्र अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याची माहिती आता सूत्रांकडून समोर आली आहे. त्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून आधी 6 जागांची मागणी करण्यात आली होती, मात्र महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला 4 जागा आल्या परंतु आता शिवसेना 5 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विधान परिषदेच्या जागा वाटपाची महायुतीमधील अंतिम फेरी आज रात्री वर्षावर होणार आहे. महायुतीमध्ये सध्या 11-4-2 असा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप 11 जागा शिवसेना शिंदे गट 4 जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 2 जागा असा हा फॉर्म्युला आहे. परंतु आता शिवसेना शिंदे गट 10-5 2 फॉर्म्युल्यासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला असून, आज रात्री उशिरा या संदर्भात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शिवसेनेला छत्रपती संभाजी नगर किंवा जळगावची जागा मिळावी यासाठी आता एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे.
दरम्यान शिवसेनेच्या वाट्याला ज्या चार विधान परिषदेच्या जागा आल्या आहेत, त्यामध्ये ठाणे आणि पालघरमध्ये उमेदवार म्हणून रविंद्र पाठक किंवा क्षितिज ठाकूर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. हिंगोली परभणीमध्ये अभिमन्यु खोतकर आणि बिप्लव बजोरीया यांच्या नावाची चर्चा आहे, तर नाशिकमधून हेमंत गोडसे, सईद खान, भाऊसाहेब चौधरी यांचे नावं आघाडीवर आहेत. तर यवतमाळमधून किरण पांडव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज जागा वाटपाची अंतिम फेरी ही वर्षावर पार पडणार असल्यानं शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला किती जागा येणार चार की पाच? तसेच त्या ठिकाणी उमेदवार कोण असणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
