कसोटी क्रिकेटमध्ये आता एकाच सामन्यात दोन रंगाचे चेंडू वापरता येणार, आयसीसीने स्पष्ट केलं की..
आयसीसीच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कसोटी क्रिकेटमध्ये लाल चेंडूऐवजी पिंक चेंडू वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय ट्रायलसाठी घेण्यात आला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बदल होत आले आहेत. आता आणखी एक क्रांतीकारक बदल करण्यात आला आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्या अध्यक्षतेखील कसोटी क्रिकेटबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कसोटी सामन्यादरम्यान प्रकाशमान कमी झाल्यानंतर आणि फ्लडलाइट्सची आवश्यकता भासल्यास लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडू वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली असून जर यात काहीच अडचण आली नाही तर भविष्यात हा नियम लागू होईल. आयसीसीच्या ताज्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दोन्ही संघ सहमत असतील तर कसोटी सामन्यादरम्यान गुलाबी चेंडू वापरला जाऊ शकतो. अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळेच या चेंडूला परवानगी देण्यात आली आहे.
असा नियम आणण्याचं कारण की…
कसोटी क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवसाला 90 षटकांचा खेळ होणं अपेक्षित असतं. पण अनेकदा प्रकाशमान कमी असल्याने सामना थांबवण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे कमी षटकांचा खेळ होतो आणि एखाद्या संघाचं नुकसान होतं. त्यामुळे दोन्ही संघांना नियमाप्रमाणे समान संधी मिळाव्या यासाठी 90 षटकांचा खेळ व्हावा यासाठी प्रयत्न असणार आहे. आयसीसी नियमानुसार, 75 षटकांच्या अखेरीस प्रकाश कमी असल्यास फ्लडलाइट्स सुरु केल्या जातील. त्यानंतर गुलाबी चेंडू वापरण्याची परवानगी दिली जाईल. कारण फ्लडलाइट्सच्या प्रकाशात गुलाबी चेंडू अधिक चांगला दिसतो. त्यामुळे षटकांची संख्या कमी होणार नाही आणि 90 षटकं पूर्ण होतील. आयसीसीने मेरीलेबोन क्रिकेट क्लब च्या सहकार्याने प्रकाश तंत्रज्ञानावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पंच आणि सामना अधिकाऱ्यांना अधिक चांगली दृश्यमानता प्रदान करण्याचा असेल. तसेच अपुऱ्या प्रकाशामुळे वाया जाणारा वेळ कमी करता येईल.
मुख्य प्रशिक्षकांना मैदानात येण्याची परवानगी
आयसीसीने टी20 क्रिकेटप्रमाणे कसोटी सामन्यात मुख्य प्रशिक्षकांना मैदानात येण्याची परवानगी दिली आहे. ब्रेक दरम्यान मुख्य प्रशिक्षक मैदानात येऊन रणनिती आखू शकतील. दुसरीकडे, गोलंदाजीची शैलीत काही संशय आढळल्यास पंच हॉक आय डेटाचा वापर करू शकतील. हा नियम प्रायोगित तत्वावर असणार आहे. यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये आणखी उत्साह वाढेल.
