T20 World Cup 2026 स्पर्धेत भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, आकडेवारीत कोण वरचढ? जाणून घ्या
आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होत आहे. हा सामना एजबेस्टनच्या ऐतिहासिक मैदानात खेळला जाणार आहे. चला जाणून घेऊयात दोन्ही संघाची आतापर्यंतची हेड टू हेड कामगिरी

IND W vs PAK W, T20 World Cup 2026: भारत पाकिस्तान सामना म्हंटलं की क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी असते. वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत क्रीडारसिकांना पुन्हा एकदा भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिलाच सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 14 जून रोजी एजबेस्टनच्या ऐतिहासिक मैदानात होणार आहे. त्यामुळे या सामन्याची आतापासूनच चर्चा रंगली आहे. या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेची सकारात्मक सुरूवात कोण करणार? याकडे लक्ष लागून आहे.
कोणाचं पारडं वरचढ?
भारत आणि पाकिस्तान महिला संघात भारतीय संघ वरचढ आहे. महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने पाकिस्तानला अनेकदा पराभवाची धूळ चारली आहे. भारतीय संघाच्या तुलनेत पाकिस्तानचा संघ कायम कमकुवत दिसला आहे. भारत आणि पाकिस्तान महिला संघात कधीच टी20 मालिका खेळली गेलेली नाही. पण हे दोन्ही संघ आयसीसी स्पर्धा, आशिया कप आणि एशियन्स गेम्स किंवा कॉमनवेल्थ स्पर्धेत आमनेसामने आले आहेत. आतापर्यंत या दोन्ही संघात 16 सामने झाले आहे. त्यापैकी 13 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर 3 सामन्यात पाकिस्तानच्या पदरी विजय पडला आहे.
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील कामगिरी
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत आतापर्यंत या दोन्ही संघात 8 सामने झाले आहेत. यापैकी 6 सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली आहे. तर फक्त दोन सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आला आहे. आता नवव्यांदा हे दोन्ही संघ भिडणार आहे. त्यामुळे या सामन्या कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आहे. दोन्ही शेवटचे 2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भिडले होते. तेव्हा भारताने पाकिस्तानला 6 विकेट राखून मात दिली होती.
दोन्ही संघाचा वर्ल्डकप स्पर्धेतील प्रवास
वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी एकमेकांपेक्षा भिन्न आहे. भारताने अनेकदा बाद फेरीत जागा मिळवली आहे. तर पाकिस्तानचा संघ प्रत्येकवेळी साखळी फेरीच्या पुढे जाताना संघर्ष करताना दिसला आहे. भारताने 2020 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण पदरी निराशा पडली. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत दोन्ही संघांचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला होता.
