IPL 2026: हार्दिक पांड्या-सूर्यकुमार यादव पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाहीत? कारण की..
आयपीएल 2026 स्पर्धेतून मुंबई इंडियन्सचं आव्हान संपुष्टात आलं आहे. आता फक्त तीन सामन्यांची औपचारिकता राहिली आहे. अशा स्थितीत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव खेळणार की नाही? याबाबत चर्चा रंगली आहे.

आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. या स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर पडला. यंदाच्या पर्वात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सुमार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पराभवाची मालिका सुरू झाली. त्यानंतर मधल्या सामन्यात एक विजय मिळवून आशा पल्लवीत झाल्या. पण पुन्हा एकदा पराभवाची मालिका सुरू झाली. त्यानंतर आणखी एक विजय मिळवला पण तिथपर्यंत प्लेऑफचं गणित चुकलं होतं. असं असताना आता तीन सामन्यांचा औपचारिक खेळ उरला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव खेळणार की नाही? याबाबत शंका आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघासोबत धर्मशाळा येथे गेला नाही. सध्या हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असून त्याच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. हार्दिक पांड्या बॅक स्पाज्मच्या कारणामुळे मागच्या दोन सामन्यात खेळला नाही. त्यामुळे या सामन्यात खेळणंही कठीण आहे. सूर्यकुमार यादवबाबतही असंच आहे. सूर्यकुमार यादवही संघासोबत धर्मशाळा येथे गेला नाही. त्याच्या घरी बाळ जन्माला आलं आहे. त्यामुळे खासगी कारण पुढे करत धर्मशाळेत गेला नाही. त्यामुळे पंजाब किंग्सविरुद्धचा सामना खेळणार नाही असंच बोललं जात आहे.
पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 14 मे रोजी सामना होणार आहे. हा सामना धर्मशाळेतील एचपीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना पंजाब किंग्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण सलग चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे प्लेऑफची शर्यत किचकट झाली आहे. आता उर्वरित तीन पैकी 2 सामन्यात काहीही करून विजय मिळवणं भाग आहे. तर मुंबई इंडियन्स या स्पर्धेतून आऊट झाली आहे, पण विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. पण हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव या सामन्यात खेळले नाही तर कर्णधारपद कोण भूषवणार आहे. असं असताना तिलक वर्माच्या नावाची चर्चा आहे. भविष्याचा वेध घेऊन त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं जाण्याची शक्यता आहे.
